- महापालिकेकडून पूर नियंत्रण कृती आराखडा तयार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२२) :- जून महिन्यापासून पावसाळा सुरू होत असल्याने महापालिकेने पूर नियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे. विविध विभागांना कामकाजांचे वाटप केले आहे. शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्यांमुळे संभाव्य बाधित होणाऱ्या भागातील नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी आवश्यक प्राथमिक शाळा व इमारती निश्चित करण्यात आल्या आहेत.
शहरातील नद्यांना पूर आल्याने प्रामुख्याने पवना नदीकाठावरील माता रमाबाई नगर भाटनगर, बौद्धनगरचा परिसर, चिंचवडगाव येथील मोरया गोसावी मंदिर परिसर, पिंपळे गुरव येथील नदीकाठचा परिसर, बोपखेल गावठाण नदीकाठचा परिसर, संजय गांधीनगर, पिंपरी रहाटणी नदीकाठचा परिसर बाधित होतो. त्याशिवाय, मधुवन सोसायटी, संगमनगर ममतानगर, दापोडी बौद्धविहार व स्मशाभूमी नदीकाठचा परिसर, पवना वस्ती आदी भागांमध्ये पुराचे पाणी शिरते. येथील नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी १२ शाळा आणि १ सांस्कृतिक भवन निश्चित करण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार केलेल्या पूरनियंत्रण आराखड्यानुसार क्षेत्रीय कार्यालय निहाय व विभागनिहाय कामकाजाचे वाटप केले आहे. नाले सफाई व पावसाळी गटारांच्या कामांना सध्या प्राधान्य दिले आहे. ही कामे त्वरीत पूर्ण करून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या आहेत.
मुळा आणि पवना नदीच्या बॅक वॉटरमुळे झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरू नये यासाठी योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. नदीकाठावर तसेच ओढे – नाले आदींवर असलेल्या झोपडपट्ट्यांचे किंवा बांधकामांचे पूर्व सर्वेक्षण करून असलेले अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व प्रभागांतील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही १५ जूनपर्यंत पूर्ण करायची आहे. पूरासंदर्भात नागरिकांना सूचना देण्यासाठी मेगाफोन यंत्रणा सुसज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पवना धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढल्यास नदीकाठचा तसेच सखल भागातील सर्व परिसर बाधित होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी तशी पूर्वतयारी करून ठेवावी. पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्याबाबत नोटीस बजावणे, अशा इमारतींची दुरुस्ती करून घेणे किंवा पाडणे आदी कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याबाबतचा पूर्तता अहवाल आयुकाना सादर करावा, अशा सूचना कृती आराखड्यात केल्या आहेत.