- अल्कोह सोसायटीमध्ये रोपांचे वाटप, लहान मुलांना दिले पर्यावरण संवर्धनाचे धडे..
- उन्नती सोशल फाऊंडेशनचा पुढाकार, दहा हजार वृक्ष लावण्याचा संकल्प…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२२) :- जागतिक पर्यावरण दिन हा एक दिवसासाठी नसून तो वर्षातील 365 दिवस साजरा केला पाहिजे. कारण, आधुनिक युगात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पृथ्वीवरील सजीव सृष्टी जिवंत ठेवायची असेल तर प्रत्येकाने वृक्षारोपण करणे गरजेचे आहे, असे मत उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई भिसे यांनी केले.
उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर येथील अल्कोह सोसायटीमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध जातीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय (आबा) भिसे, विजय भांगरे, अतुल जैन, वृषल केदार, दिगंबर पाटील, दिपाली राडे, नेहा आठवले, नवले, देवेन तायडे, राहुल गाढे, दादा नवले, मनोज मोरे आणि लहान मुले उपस्थित होती. यावेळी लहान मुलांवर पर्यावरण संवर्धनाचे संस्कार व्हावेत. त्यांना निसर्गाचे महत्त्व पटवून देण्यासाठी उन्नतीच्या वतीने रोपं देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
सौ. कुंदाताई भिसे म्हणाल्या, आपण सर्वजण पर्यावरणाशी निगडित आहोत. या सृष्टीने आपल्याला खूप काही दिले आहे. त्याचे रक्षण करणे आपली जबाबदारी आहे. पण, आधुनिक युगात विकासाच्या नावाखाली आपणच सृष्टीचे भक्षक बनत चाललो आहोत. हे कुठेतरी थांबायला हवं. आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर प्राणवायू निर्मित करणार्या पर्यावरणाचे जतन केले पाहिजे. प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत. ती वाढवली पाहिजेत. तरच पर्यावरण दिन साजरा केल्याचे सार्थक होईल, असेही कुंदाताई म्हणाल्या.
अल्कोह सोसायटीच्या सदस्या नेहा आठवले म्हणाल्या, कुंदाताईंनी दिलेल्या रोपांमुळे सोसायटीच्या सौंदर्यात भर पडणार असून त्यातून पर्यावरणाचे संगोपन होणार आहे. उन्नतीचे कार्य कौतुकास्पद आहे. विविध उपक्रमाच्या माध्यमातून कुंदाताईंची सेवा आम्हाला मिळते. कोणतीही समस्या मांडल्यानंतर त्वरित सोडविली जाते. त्यामुळे उन्नतीचा आम्हाला कायम अभिमान वाटतो.
कुंदाताईंच्या उपक्रमाचे कौतुक..
अल्कोह सोसायटीमधील नागरिकांनी कुंदाताईंच्या या उपक्रमचे कौतुक केले. उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने मिळालेल्या रोपांचे तसेच महाराष्ट्राचे राज्यपुष्प असलेल्या वनस्पतीचे मोठ्या वृक्षामध्ये रुपांतर होईपर्यंत आम्ही याचे संगोपन करू, असे आश्वासन ही त्यांनी दिले. तसेच, गेली पाच वर्ष उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर व शक्य असेल त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. आजपर्यंत हजारो झाडे लावण्यात आली आहेत. येणार्या काळात दहा हजार वृक्ष लागवड करण्याचे लक्ष्य समोर ठेवण्यात आले आहे.