न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०२२) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के एवढा लागला आहे.
सन २०२० च्या परीक्षेच्या तुलनेत यंदाच्या निकालात ३.५६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुलांपेक्षा मुलींना निकालात बाजी मारली आहे. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.२१ टक्के तर सर्वात कमी मुंबई विभागाचा ९०.९१ टक्के एवढा आहे.
बारावीची परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यातील १४ लाख ८५ हजार १९१ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. मुले ९३.२९ तर मुली ९५.३५ टक्के उतीर्ण झाले आहेत. विभागीय मंडळनिहाय कोकण ९७.२२, नागपूर ९६.५२, अमरावती ९६.३४, लातूर ९५.२५, कोल्हापूर ९५.०७, नाशिक ९५.०३, औरंगाबाद ९४.९७, पुणे ९३.६१, मुंबई ९०.९१ टक्केवारीत पिछाडीवर आहे.