- १२ वीची पुरवणी परीक्षा २१ तर १० वी ची २७ जुलैला…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२२) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाच्या दहावी परीक्षेच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात पुन्हा सावीत्रीच्या लेकींनी बाजी मारली. राज्याच्या एकुण निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल ९६.०६ टक्के लागला आहे. राज्यात कोकण विभाग पुन्हा अव्वल ठरला असून त्या पाठोपाठ कोल्हापूर विभागाने दुसरा क्रमांक मिळवला आहे.
राज्य मंडळाच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा ९९.२७ टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नाशिक ९५.९० टक्के विभागाचा लागला आहे. एकूण १५,६८,९७७ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १५,२१,००३लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. २०२०च्या तुलनेत निकालात तब्बल १.६४ टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
राज्यात २२ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवलेले आहेत. शिवाय ८२ हजार ६० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त टक्के गुण मिळालेले आहेत. १२ हजार २१० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, “१२ वीची पुरवणी परीक्षा २१ जुलैपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा २१ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत होईल. १० वीची पुरवणी परीक्षा २७ जुलैला सुरू होईल. ही परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट या दरम्यान घेण्यात येईल.” “१२ वीचे अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली आहे, तर १० वीचे अर्ज २० जूनपासून घेण्यास सुरुवात करणार आहे,” असंही मंडळाने नमूद केलं.
विभागनिहाय टक्केवारी…
कोकण विभाग – ९९.२७ टक्के
कोल्हापूर विभाग – ९८.५० टक्के
पुणे विभाग – ९६.९६ टक्के
नागपूर विभाग -९७ टक्के
औरंगाबाद विभाग – ९६.३३ टक्के
मुंबई विभाग – ९६.९४ टक्के
अमरावती विभाग – ९६.८१ टक्के
नाशिक विभाग – ९५.९० टक्के
लातूर विभाग – ९७.२७ टक्के