- शिवसेनच्या सायंकाळच्या बैठकीत बंडखोर आमदारांबाबत महत्वाचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०२२) :- एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले असतानाच आता शिवसेनेकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील वर्षा बंगल्यावर बुधवारी संध्याकाळी ५ वाजता शिवसेनेची महत्त्वाची बैठक होत आहे.
या बैठकीला शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी उपस्थित राहावे. अन्यथा त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी यासंदर्भातील पत्र शिवसेनेच्या सर्व आमदारांना पाठवले आहे. या पत्रात बुधवारी दुपारी ५ वाजता शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना आमदरांना देण्यात आल्या आहेत.
राज्यात पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने आणि त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी वर्षा बंगल्यावर आज सायंकाळी ५ वाजता तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी सर्वांची उपस्थिती आवश्यक असल्याचे पत्रात म्हटले आहे. या बैठकीला उपस्थित न राहिल्यास स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडण्याचा तुमचा इरादा स्पष्ट आहे, असे ग्राह्य धरण्यात येईल. त्यानुसार भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात असलेल्या तरतुदीनुसार तुमच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा शिवेसनेच्या बंडखोर आमदारांना देण्यात आला आहे.
जोपर्यंत शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत येत नाहीत तोपर्यंत मत व्यक्त करता येणार नाही. या सगळ्या प्रकरणातून शिवसेना तावुनसुलाखून बाहेर पडेल. निष्ठेच्या अग्नीपरीक्षेत किती जण उत्तीर्ण होतात, हे भविष्यात समजेल, असे संजय राऊत यांनी सांगितले.