न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जुलै २०२२) :- एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारने आज सोमवार दि.४ जुलै रोजी विश्वासदर्शक ठराव जिंकत विधानसभेत बहुमत सिद्ध केले. शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने १६४ सदस्यांनी मतदान केले. शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला होता. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या बाजूने फक्त ९९ मते पडली आहेत. त्यामुळे ६३ मते भाजप-शिंदे गटाला अधिकाची मिळाली आहेत. रविवारी भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर सभापती झाल्यामुळे शिंदे सरकारने पहिला अडथळा दूर केला आहे. गेले १० दिवस चाललेल्या राजकीय नाट्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्याचवेळी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत.
दरम्यान, रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली. बहुमत सिद्ध करण्याच्या रणनीतीबाबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत शिंदे गट आणि भाजपाचे आमदार उपस्थित होते. आपल्याला ४० बंडखोर शिवसेना आमदारांचा पाठिंबा असल्याचा शिंदेंचा दावा आहे. तर १६६ मतांनी सरकार बहुमत सिद्ध करेल, असा दावा फडणवीस यांनी केला होता
एकनाथ शिंदे सरकारतर्फे सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला आणि त्याला भरत गोगावले यांनी अनुमोदन दिले. यावेळी विरोधी पक्षाने मतविभागणीची मागणी केली आणि ती अध्यक्षांनी मान्य केली. तालिका अध्यक्षपदी आशिष शेलार, योगेश सागर, संजय शिरसाट, संग्राम थोपटे आणि चेतन तुपे यांची निवड करण्यात आल्याचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी जाहीर केले.
दरम्यान उद्धव ठाकरे गटातील आमदार संतोष बांगर हे एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याची माहिती समोर आली आहे. हिंगोलीचे आमदार असलेले संतोष बांगर हे कालपर्यंत शिवसेनेसोबत एकनिष्ठ होते. त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने मतदान दिले होते. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत संतोष बांगर दिसल्याचे शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. हिंगोलीचे आमदार एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांची संख्या ४० झाली आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडे १५ आमदार उरले आहेत.