- पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौणिमा उत्साहात साजरी….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२२) :- गुरुच्या परिस स्पर्षाशिवाय मनुष्यातील अज्ञानरुपी अंधकार दूर होत नाही आणि ज्ञानाचा दीपही प्रज्वलित होत नाही. गुरुच्या सहवासाशिवाय सत्य-असत्याची जाणीवही होत नाही आणि काय योग्य, काय अयोग्य याचेही ज्ञान गुरुच्या संगतीशिवाय मिळत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे महत्त्व हे अनन्यसाधारण असते. जीवन जगताना कोणाला आई-वडिलांच्या कष्टातून-शिकवणीतून गुरु भेटले तर कोणाला शिक्षकांच्या एका प्रोत्साहनपर शब्दाने आयुष्याची दिशा मिळाली. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटणारी आणि नवे काहीतरी शिकवणारी प्रत्येक व्यक्ती मग ते आई-वडील, शिक्षक, मित्र कोणीही असो त्यांच्याकडून चांगले तेवढे घेण्याची वृत्ती सतत जागृत ठेवा, असे प्रतिपादन चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या उपाध्यक्षा सौ. अनिताताई संदीप काटे यांनी केले.
पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौणिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी अनिताताई काटे बोलत होत्या. या कार्यक्रमास शाळेच्या उपाध्यक्षा सौ. अनिताताई संदीप काटे, सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक संदीप काटे, सौ. निहाराताई, लीनाताई काटे, सौ. आरती जोंधळे, सौ. अनिता ज्ञानेश्वर काटे, शाळेच्या प्राचार्य सुषमा उपाध्ये, प्रि-प्रायमरी विभागप्रमुख पलक गांधी, पालक, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सर्वप्रथम मातृपुजन करीत गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरूची महती विशद करणारी भाषणे केली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी गीत गायन आणि बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
शाळेच्या प्राचार्य सुषमा उपाध्ये म्हणाल्या, आपल्या गुरूने दिलेलं ज्ञान आत्मसात करावे, गुरूंकडून मिळवलेलं ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. गुरूने दिलेल्या ज्ञानामुळे आपलं जीवन यशस्वी झाले यासाठी सतत गुरूबद्दल कृतज्ञ असावे. या कृतज्ञतेपोटी गुरूंची सेवा आणि आदर करणे म्हणजे खरं गुरूपूजन, अशा प्रकारच्या गुरूपूजनातून गुरूला खरी गुरूदक्षिणा मिळत असते.
सौ. मीनल जोशी यांनी प्रस्ताविक तर, सौ. शीतल धावले यांनी आभार व्यक्त केले.