न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ सप्टेंबर २०२२) :- पिंपरीतील नेहरूनगर येथील आंबेडकरनगर झोपडपट्टीवर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून (एसआरए) शुक्रवारी (दि. २३) कारवाई करून एकूण ९६ झोपड्यांच्या जागा ताब्यात घेण्यात आली आहे. सुरुवातीला कारवाईस विरोध झाला. मात्र, मोठा पोलिस बंदोबस्त पाहून रहिवाशांनी स्वतःहून झोपड्या खाली केल्या. त्याच ठिकाणी झोपडीधारकांचे पुनर्वसन केले जाणार आहे.
आंबेडकरनगरमध्ये एसआरए योजनेचा प्रस्ताव ओम साई कन्ट्रक्शनने दिला आहे. तेथील २ हजार २३७.१० चौरस मीटर जागा महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम १९७१ चे कलम ३ क अन्वये २४ नोव्हेंबर २०१७ ला झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. एकूण १३७ पैकी ९६ झोपडीधारकांनी झोपडी खाली करून विकसकाच्या ताब्यात दिलेली नसल्याने यांना २५ नोव्हेंबर २०२१ ला नोटीसा बजावण्यात आल्या होता. या नोटीशीच्या विरोधात तक्रार निवारण केंद्र समितीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या योजनेस स्थगिती देता येणार नाही, असे समितीने १४ जानेवारी २०२२ ला सूचित केले. त्या विरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला. तो दावा २५ जुलै २०२२ ला न्यायालयाने फेटाळला. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात २९ ऑगस्ट २०२२ ला याचिका दाखल केल्याची प्रत एसआरए कार्यालयास ९ सप्टेंबर २०२२ ला मिळाली. त्याबाबत न्यायालयाकडून कोणताही आदेश प्राप्त न झाल्याने एसआरए विभागाने झोपडीधारकांना ४८ तासांत आपली झोपडी रिकामी करण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, झोपडीधारकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे एसआरए विभागातर्फे आज कारवाई करण्यात आली.
काही नारिकांनी कारवाईस विरोध केला. पोलिस बंदोबस्त व फौजफाटा वाढविल्याने बहुतांश रहिवाशांनी स्वत:हून साहित्य काढून घेतले. कारवाईसाठी मोठ्या संख्येने जेसीबी मागविण्यात आले होते. सकाळी दहाला सुरू झालेली कारवाई सायंकाळपर्यंत सुरू होती. दरम्यान, या जागेवरच झोपडीधारकांचे पुनर्वसन केले जाणार असून, त्यांना ३०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची सदनिका मोफत दिली जाणार आहे, असे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले.