- तीनचा प्रभाग होवू वा चारचा फार फरक पडत नाही – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. २६ सप्टेंबर २०२२) :- महापालिका निवडणुका तोंडावर आहेत असे आपण म्हणतोय पण; हे सरकार निवडणुकांना घाबरत आहे. एनकेण प्रकारे निवडणुका लांबणीवर टाकल्या जात आहेत. जनमत विरोधात गेले आहे, हे त्यांना माहिती आहे. आमची मागणी निवडणुका लवकर घ्या. लोक बरोबर असतील तर; तीनचा प्रभाग होवू वा चारचा फार फरक पडत नाही. त्यांनी कशी कामे केली यावर अवलंबून आहे. मला विश्वास आहे, महापालिकांमध्ये आमचीच सत्ता येईल, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी (दि. २६) काळेवाडी येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे चांगले काम आहे. भाजपमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. राज्यात राष्ट्रवादीची सत्ता होती. तेव्हा राष्ट्रवादीत येण्याचे प्रमाण जास्त होते. मात्र, सत्तेतून जाताच हे प्रमाण कमी झाले आहे. जेव्हा पालिका निवडणुका जाहीर होतील, तेव्हा त्यांचा विचार पुन्हा बदलेल, असे वाटते. पालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी करण्याबाबतचा निर्णय स्थानिक नेत्यांच्या शिफारशीनुसार घेतला जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
शिवसेना आणि शिंदे गटाच्या याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठापुढे महत्वाची सुनावणी आहे. त्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, देशात न्याय असेल. न्यायव्यवस्था शिल्लक असेल तर राज्य घटनेच्या १० सुचिनुसार पक्षा आदेशाविरोधात मतदान केलेल्यांची आमदारकी रद्द होणे अपेक्षित आहे. न्यायालयाच्या निर्णयाकडे आमचेही लक्ष्य असून त्याबाबत कुतूहल आहे. न्याय व्यवस्थेवर विश्वास वाटावा असा निकाल येईल आणि आमचा विजय होईल अशी खात्री आहे.
न्यायालयाने निर्णय दिला तर १६ जणांची आमदारकी रद्द होईल. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. जर असा निकाल लागला तर मुख्यमंत्रीपदासाठी नवीन पर्याय निवडावा लागेल अथवा राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल, अशा दोन शक्यता वर्तविल्या. त्यानंतर मध्यावधी निवडणुकांना सामोरे जावे लागू शकेल असा अंदाजही त्यांनी वर्तविला.
अजितदादा नाराज असल्याच्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना पाटील म्हणाले बावनकुळे हे मंत्रिपदाच्या विवंचनेत आहेत. राज्यात मुख्यमंत्री बदल व्हावा आणि आपल्याला मंत्रिपद मिळावे असे त्यांना वाटत आहे.