- विलास मडिगेरी यांच्या पाठपुराव्याला यश; आयुक्तांचे मानले आभार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरवस्ती विभागाअंतर्गत दहावी आणि बारावी बक्षीस योजनेत तत्कालीन आयुक्तांनी अनेक बदल केले. परंतु त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा फटका खासगी शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना बसणार होता. या विद्यार्थ्यांना देखील महानगरपालिकेकडून कौतुकाची थाप मिळावी, यासाठी केलेल्या पाठपुराव्याला अखेर आयुक्त शेखर सिंह यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे यश आले. एसएससी बोर्डासह सीबीएससी व आयसीएसईच्या तसेच १२ वी ८० टक्के वरील विद्यार्थ्यांना बक्षिस मिळणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी दिली आहे.
आयुक्त शेखर सिंह यांनी या संदर्भात प्रशासक म्हणून धोरणात्मक निर्णय घेऊन विद्यार्थी व पालकांना दिलासा दिला आहे. या संदर्भात विलास मडिगेरी यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभाग इतर कल्याणकारी योजनेअंतर्गत अंतर्गत दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस योजना अनेक वर्षापासून महानगरपालिकेच्या वतीने चालू केलेली आहे. इतर कल्याणकारी योजने अंतर्गत दहावी-बारावीच्या ८० % पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येत आहे.
यापूर्वी सर्व बोर्डाना म्हणजे एसएससी बोर्ड, सीबीएससी आणि आयसीएसई सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना ही गुणवंत विद्यार्थी योजना लागू होती. परंतु तत्कालीन आयुक्तांनी प्रशासकीय राजवटीमध्ये फक्त एसएससी बोर्डाच्या आणि आरटीईअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतूक किंवा अभिनंदन करताना त्यामध्ये श्रीमंत-गरिब असा कोणताही भेदभाव करणे गैर आहे. तरी ही बक्षीस योजना सीबीएससी व आयसीएसई यांनाही पूर्वी प्रमाणेच सुरू करावी, अशी लेखी मागणी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली. नंतर फोन वरून फॉलो अप घेतला याबाबत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर नुकतेच त्यांनी आपल्या प्रशासकीय अधिकारात धोरणात्मक निर्णय घेत विद्यार्थी मित्रांना दिलासा दिला आहे.
आयुक्त शेखर सिंह यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता यापूर्वीप्रमाणे सर्व बोर्डाना म्हणजे एसएससी बोर्ड, सीबीएससी आणि आयसीएसईच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना या गुणवंत बक्षिस योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये दहावी व बारावीसाठी ८० ते ९० टक्के गूण मिळविणा-या एस.एस.सी बोर्डाच्या आणि आरटीईअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना १० हजार, तर इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ५ हजार रुपये बक्षिस दिले जाणार आहे. तर ९० टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळविणा-या एस.एस.सी बोर्डाच्या आणि आरटीईअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना १५ हजार, तर इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ७ हजार ५०० रुपये बक्षिस मिळणार आहे. या निर्णयामुळे पालक व विद्यार्थी यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे. आमच्या मागणीचे विचार केल्यामुळे आयुक्तांचे अभिनंदन व आभार.