- प्रवासाचे सहा किलोमीटर अंतर कमी होणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२२) :- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली आहे. लोणावळा ते खोपोली एक्झिट असा १३.३ किलोमीटरचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील दोन्ही बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुणे- मुंबई महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची २० ते २५ मिनिटांची बचत होणार आहे. कारण, हा प्रकल्प पूर्ण होताच सहा किलोमीटर अंतर कमी होणार आहे. आशिया खंडातील सर्वात जास्त रुंदी (२३.७५ मी) चा बोगदा असल्याच सांगण्यात येत आहे. वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही सूचना देखील केल्या. अनेकदा वाहतूक कोंडी, दरड कोसळण्याच्या घटनांमुळे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक, प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. पण, मिसिंग लिंक प्रकल्पामुळे हा मनस्ताप कमी होऊ शकणार आहे. कारण लोणावळा ते खोपोली एक्झिट असा १३ किलोमीटरच अंतर बोगद्याच्या माध्यमातून प्रवास करता येणार आहे. या बोगद्याच काम जलदगतीने सुरू आहे.
बोगद्याचे काम हे अंतिम टप्प्यात असून डिसेंबर महिन्यात पूर्ण करण्याचा मानस एमयसआरडीसीचा आहे. या प्रकल्पामुळे बोरघटातील वाहतूक कोंडीतून प्रवाश्यांची सुटका होणार आहे. प्रकल्पात दोन बोगदे आणि दोन व्हाया डक्टसह आठ पदरी नवीन रस्ते बांधले जाणार आहेत. लोणावळा पासून सुरू होणारा हा बोगदा खोपोली एक्झिट येथे संपणार आहे.
















