न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च) :- अखिल भारतीय कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या आदेशानुसार देशातील जातीयवादी शक्तींना लोकसभा निवडणूकीत रोखण्यासाठी समविचारी पक्षांबरोबर राष्ट्रीय पातळीवर आघाडी करण्यात आली आहे. भ्रष्ट व जातीयवादी सरकार विरुध्द पुरोगामी शक्तींनी एकत्र येऊन या निवडणूकीत त्यांना पराभूत करावे, असे आवाहन खा. राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.
त्या पार्श्वभूमीवर शनिवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांची बैठक झाली. या बैठकीत ठरल्याप्रमाणे पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभेतील कॉंग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक निगडी प्राधिकरणात रविवारी सकाळी साठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या सूचना मांडल्या. याची दखल घेऊ असे साठे यांनी या बैठकीत सांगून सर्व कार्यकर्त्यांना आश्वस्त केले.
मावळ व शिरुर लोकसभेच्या आघाडीच्या उमेदवारांचे काम करीत असताना कॉंग्रेस पक्षांच्या नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान आघाडीच्या उमेदवारांकडून व नेत्यांकडून राखला जाईल अशी हमी अजित पवार यांनी दिली असल्याचेही साठे यांनी सांगितले. प्रचाराची पुढील दिशा ठरविण्यासाठी आघाडीच्या उमेदवारांची पुढील आठवड्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षांच्या शहराध्यक्षांसह, प्रमुख पदाधिका-यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. यानंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रभारी पक्षनिरीक्षक सोनल पटेल आणि राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आघाडीतील मित्रपक्षांबरोबर भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ही सचिन साठे यांनी सांगितले.
या बैठकीस माजी महापौर कविचंद भाट, महिला प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, अनुसूचित जातीविभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष गौतम आरकडे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, प्रदेश पदाधिकारी बिंदू तिवारी, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सेवादल शहराध्यक्ष मकर यादव, लक्ष्मण रुपनर, हरी नायर, भाऊसाहेब मुगूटमल, सुनिल राऊत, किशोर कळसकर, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, विष्णूपंत नेवाळे, बाळासाहेब सांळूखे, परशूराम गुंजाळ, सतिश भोसले, सर्ज्जी वर्की, किरण जैन, विशाल कसबे, बाबा बनसोडे, तानाजी काटे, अनिरुध्द कांबळे, माधव पुरी, दिपक जाधव, हूरबानो शेख, नंदा तुळसे, विनिता तिवारी, अलका काळे, शितल कोतवाल, सविता पवार, अनिता बोबडे, भास्कर नारखेडे, समशेर मिर्जा, चंद्रशेखर जाधव, संदेश बोर्डे, तुषार पाटील, वशीम शेख, रोहित शेळके, सौरभ शिंदे, अण्णा कसबे, राजेंद्र काळे आदी प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.











