न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२३) :- महाराष्ट्रातील पहिला शून्य कचरा कार्यालय प्रकल्प उपक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिका क क्षेत्रिय कार्यालय येथे राबविण्यात येत आहे. जागतिक शून्य कचरा दिवस तीस मार्च निमित्ताने या उपक्रमाचे कार्यान्वयन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते उद्या (दि. ३०) रोजी होणार आहे.
‘’आम्ही कचरा निर्माण करत नाही आम्ही संपत्ती” निर्माण करतो, या संकल्पनेला आधारभुत ठेऊन क क्षेत्रीय कार्यालयाचे सहा.आयुक्त अण्णा बोदडे यांनी आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाची आखणी केली आहे.
शून्य कचरा कार्यालय उपक्रमांतर्गत क्षेत्रीय कार्यालयात एकूण १५३ अधिकारी/ कर्मचारी कार्यरत असून त्यापैकी ४१ महिला व ९२ पुरूष कर्मचारी आहेत. कार्यालयातील कर्मचारी यांच्याकडून दैनंदिन निर्माण होणारा जेवणाचा कचरा, वापरलेले कागद, वापरलेले पेन, कार्यालय परिसरातील झाडांचा पालापाचोळा व प्लास्टिक यांचे अलगीकरण करण्यात येत आहे. यासाठी कर्मचाऱ्यांची कार्यशाळा क्षेत्रीय स्तरावर घेण्यात आली. प्रत्येकाने प्लास्टिकची पाण्याची बॉटल, जेवणाचा प्लास्टिकचा डब्बा, प्लास्टिकची पिशवी बंद केली जाण्यासाठी प्रबोधन करण्यात आले आहे. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसापासून कार्यालयातील कर्मचारी अधिकारी जेवणाचा डब्बा आणि पाणी पिण्याची बॉटल धातूची वापरत आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून वापरण्यात येणारा लेखनाचा आणि छपाई केलेला पेपर फाडून कचरापेटीत जायचे तथापि या उपक्रमांतर्गत वापरलेले कागद याचे संकलन करून लगदा तयार करून पुर्नवापर करण्यात येणार आहे व त्यातून मिळणारे नवीन कागद हे कार्यालयासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना लागणाऱ्या कागद खरेदीचा खर्च यावर बचत होणार आहे. क क्षेत्रीय कार्यालयात दररोज निर्माण होणारा सुका कचरा २० किलो पालापाचोळा व निर्माल्य ४१ किलो एकूण ६१ किलो दिवसाला म्हणजे महिन्याला सुमारे २ टन आणि वर्षाला २४ टन कचरा निर्माण होत होता. त्यांचे संकलन एका वाहनातून होत असे हा कचरा मोशी कचरा डेपो येथे दररोज वाहतूक करण्यात येत होता.
शून्य कचरा कार्यालय उपक्रमामुळे सदर वाहतूक पूर्णपणे बंद होऊन आर्थिक बचत व वाहतुकीसाठी लागणारे इंधनाचे बचत होणार आहे. कार्यालयातील ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यात येत असून त्याचा वापर महानगरपालिकेच्या उद्यान विभागासाठी करणेत येणार आहे, त्यामुळे उद्यानासाठी खत खरेदी करिता येणाऱ्या खर्चात बचत होऊ शकेल.
क क्षेत्रीय कार्यालयात प्लास्टिकची पिशवी व बॉटल घेऊन आलेल्या अभ्यांगतांचे प्रबोधन करण्यात येत आहे. प्रथमतः येणाऱ्या अभ्यांगतासाठी प्लास्टिक पिशवी संकलित करून त्यांना कापडी पिशवी मोफत देऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. एखाद्या अभ्यांगत दुसऱ्यांदा ही प्लास्टिक पिशवी घेऊन कार्यालयात आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.