- राज्य मंडळाकडून निकालांबाबत सूतोवाच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२३) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल ३१ मे पूर्वी, तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. सीबीएसईने निकाल एकाच दिवशी जाहीर केल्यामुळे राज्य मंडळाचा निकाल कधी जाहीर होईल, याबाबत विचारणा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने निकालांबाबत सूतोवाच केले आहे.
राज्य मंडळाची दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत, तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत झाली. बारावीच्या परीक्षेला साधारण १४ लाखांच्या आसपास, तर दहावीच्या परीक्षेला साधरण १६ लाखांच्या आसपास विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. या दोनी परीक्षा होऊन साधारण दीड महिन्याचा कालावधी उलटला असल्याने, विद्यार्थी पालकांचे लक्ष दहावी-बारावीच्या निकालाकडे लागले आहे.
राज्यातील शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी काही दिवस शैक्षणिक कामे होऊ शकली नाहीत. त्यामुळे साधारण आठवडाभर बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे कामे होऊ शकले नाही. संपाचा दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर फारसा फरक पडलेला नाही. राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून दहावी-बारावी उत्तरपत्रिका तपासणी तसेच गुणपत्रिकांच्या कामाचा आढावा घेण्यात येत आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मे अखेरपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करण्यात येईल तर जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी राज्य मंडळ प्रयत्नशील आहे.
– शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ…