- वाढत्या गुन्हेगारींची कशी करणार उकल?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे २०२३) :- तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तीर्थक्षेत्र देहू परिसरासाठी तीन कोटी रुपये मंजूर आहेत. मात्र एक तपानंतरही सीसीटीव्ही कॅमेरे अद्यापही बसविण्यात आलेले नाहीत. सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीचा असतानाही दुर्लक्षित झालेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना मुहूर्त कधी लागणार, असा सवालही आता नागरिक करीत आहेत.
सध्या गुन्हेगारी जगतात कोणतीही घटना घडली की पोलिसांना तपास करताना सर्वाधिक मदत होते ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे हे महत्व जाणून राज्य शासनाने देहू, आळंदी आणि पंढरपूर या तीर्थस्थळाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला. मात्र शासनाचाच हा निर्णय लालफितीच्या कारभारात अडकला आहे. तब्बल बारा वर्ष उलटूनही या कामाला अद्याप महूर्त लागलेला नाही. भविष्यातही मुहूर्त कधी मिळेल, हे देखील निश्चित सांगता येणार नाही.
पिंपरी चिंचवड शहर देहूनगरीच्या शेजारी आहे. त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आणि त्यांची अंमलबजावणी सुरू देखील झाली आहे. मात्र बारा वर्षानंतरही देहूकरांना यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने यापेक्षा आणखी दुर्दैव ते कोणते म्हणावे.
जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या ४०० व्या जन्मशताब्दी निमित्त तात्कालीन राज्य सरकारने तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत तीर्थक्षेत्र देहू, आळंदी आणि पंढरपूर यांच्या विकासासाठी मोठे निधीचे आकडे घोषित केले. त्या अनुषंगाने देहू परिसरातील विविध विकास कामांची माहिती संकलित करीत सुमारे १८० कोटी रुपये मंजुरी करण्यात आले. प्रत्यक्षात कामांना सुरुवात करण्यात आली. यामध्ये अनेक कामे करण्यात आली असून काही कामे रद्दही करण्यात आली आहेत. तर प्रतिक्षेत असणाऱ्या कामांमध्ये सुमारे तीन कोटींचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे काम प्रतिक्षेत आहे.
देह परिसरात दिवसेंदिवस वास्तव्यास येणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. वाढते गृहप्रकल्प, सोसायट्या तर गुंठे दोन गुंठे जागा घेऊन चाकरदाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या बांधकामामुळे परिसराचा डोलारा वाढत आहे. त्यामुळे देहू ग्रामपंचायतीचे दोन वर्षांपूर्वी नगरपंचायतीत रूपांतर झाले आहे सध्या सुरू असणारे सुडाचे राजकारण, परप्रांतीची वाढणारे लोंढे, वाढते घरफोड्या, लूटमार, चोरीच्या घटना, पाकीटमार, मोबाइल चोऱ्या, महिलांची छेडछाड, विनयभंग, लैंगिक अत्याचार, हाणामान्या, अपघात आदी घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक असुरक्षित झाला आहे.