न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२३) :- महाराष्ट्राच्या राजकीय जिवनावर संत साहित्य, विचारांचा प्रभाव असल्यामुळे पक्ष आणि राजकीय मते वेगवेगळी असताना देखील आमच्यात कटुता कधीच नव्हती. ही महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा होती. विचारात मतभेद असूनही मनभेद नसणे, याचे संसदीय इतिहासातील महाराष्ट्र हे उदाहरण आहे. आज विचारभिन्नता नाही, तर विचारशुन्यता ही आपली प्रमुख समस्या आहे, असे परखड मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (दि. २९) निगडीत मांडले.
निगडी येथे प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या जिवनावर आधारित “परामर्श एका शिल्पकाराचा” या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी मध्यप्रदेशचे माजी मुाख्यमंत्री तथा ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी आमदार उल्हास पवार, गौतम चाबुकस्वार, संत सागित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, आयुक्त शेखर सिंह, भाजप नेते सदाशिव खाडे, एकनाथ पवार, सदाशिव खाडे, नामदेव ढाके, लेखक विजय जगताप आदी उपस्थित होते.
गडकरी पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात वेगळेपण राहिलेले आहे की, पक्ष आणि राजकीय मते वेगळी असताना आमच्यात कटुता कधीच नव्हती. महाराष्ट्राची हीच सांस्कृतिक परंपरा राहिलेली आहे. वैचारिक मतभेद असताना देखील वैयक्तीक संबध चांगले आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय जिवनावर साहित्य, कला, संस्कृती या संत विचारांचा प्रभाव आहे. ज्ञानेश्वरी, गाथा, ग्रामगीता या भविष्याच्या उपयोगाच्या आहेत. आताच्या घडीला विचारभिन्नता नाही, तर विचारशुन्यता ही आपली समस्या आहे. त्यामुळे राजकारणात, समाजकारणात तुमचे विचार कोणते आहेत, यापेक्षा विचार असणे जास्त महत्त्वाचे आहे. राजकारण, समाजकारणात अनेक समस्या येत असतात. पण, आपल्या विचारावर ठाम राहून काम करत राहणे, गरजेचे आहे.
रामकृष्ण मोरे यांचे शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मोलाचे योगदान होते. त्यांचे या सर्व क्षेत्राबाबत स्वत:ची काही वेगळी मते असल्याचे त्यांच्यासोबत काम करताना मला जाणवले, असे गडकरी यावेळी म्हणाले.
संत तुकाराम महाराजांची गाथा, संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि संत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता हे ग्रंथ कायम विचार आणि प्रेरणा देणारे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात संत विचारांच्या सादरीकरणात आता तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. ते विचार नव्या पध्दतीने नवीन पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यासाठी देखील माझा प्रयत्न सुरू आहे. अध्यात्मिक विज्ञानाव्दारे नव्या पिढीच्या मनापर्यंत संत विचार जाण्यास मदत होईल. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, तुकडोजी महाराजांना कधीच कोणी डिलिट करू शकत नाही, असेही गडकरी आवर्जून म्हणाले.












