- महावितरणचे ग्राहकांना आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२३) :- महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वार्षिक बिलाच्या सरासरी दोन महिन्यांची सुरक्षा अमानत रक्कम घेण्याची महावितरणला परवानगी दिलेली आहे. यापूर्वी ग्राहकांनी एक महिन्याची सुरक्षा रक्कम भरलेली असून उर्वरित एक महिन्याची सुरक्षा रक्कम भरण्याचे आवाहन केले आहे.
अजूनही बऱ्याच ग्राहकांनी याचा भरणा केलेला नाही. ज्यांनी ही रक्कम भरली नाही, त्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार असून संबंधितांनी उर्वरित सुरक्षा रक्कम भरण्याचे महावितरणने आवाहन केले आहे.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या पुरवठा कोड अधिनियम २००५ नुसार वीज ग्राहकाला वार्षिक बिलाच्या सरासरी एक महिन्याची सुरक्षा अमानत घेण्याची महावितरणला परवानगी देण्यात आलेली होती. परंतु, यात २०२१ मध्ये बदल करण्यात आले आहेत. नवीन पुरवठा कोड अधिनियम २०२१ नुसार वीज ग्राहकाकडून वार्षिक बिलाच्या सरासरी दोन महिन्यांची सुरक्षा रक्कम भरली नसेल त्यांचा वीज पुरवठा ३० दिवसांचा कालावधी संपल्यावर खंडित करण्यात येणार आहे.
ज्या ग्राहकांनी उर्वरित सुरक्षा रक्कम भरली नसेल त्यांचा वीज पुरवठा ३० दिवसांचा नोटीस कालावधी संपल्यावर खंडित करण्यात येणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी वेळेत उर्वरित सुरक्षा रक्कम जमा करावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.