- चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळ यान उतरवणारा भारत ठरला पहिला देश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२३) :- गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या चांद्रयान ३ या मोहिमेकडे होतं. भारताचं हे चांद्रयान आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरलं. विक्रम लँडरने चंद्रावर सॉप्ट लँडिंग केलं.
अलिकडेच रशियाने लूना २५ या मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यात तांत्रिक बिघाड झाला आणि रशियाची मोहीम अपयशी ठरली. त्यापाठोपाठ भारताची चांद्रयान मोहीम सुरू होती. भारताच्या मोहिमेबद्दल लोकांच्या मनात धाकधूक होती. परंतु, ही मोहीम यशस्वी होईल असा विश्वास इस्रोने व्यक्त केला होता. आम्ही चांद्रयान २ च्या अपयशातून खूप काही शिकलो आहोत असं वैज्ञानिकांनी म्हटलं होतं. भारताचे शास्त्रज्ञ त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासावर खरे उतरले आहेत. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयानाचं चंद्रावर यशस्वी लँडिंग केलं आहे.
अनेक अडथळे पार करत भारत आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळ यान उतरवणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरला आहे.
भारताने आज अविस्मरणीय आणि ऐतिहासिक क्षण अनुभवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रतिक्षा होती तो क्षण पूर्ण झाला असून भारत देश आता चंद्रावर पोहोचला आहे. भारताची अतिमहत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाली असून भारताने चंद्रावर पाठवलेले अंतराळयान चंद्रावर यशस्वीरित्या पोहोचले आहे. हा क्षण सर्वांनीच दृश्यप्रणालीच्या माध्यमातून अनुभवला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दक्षिण अफ्रिकेतून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यानंतर भारतीयांशी संवाद साधला.
“माझ्या प्रिय कुटुंबियांनो, जेव्हा आपण आपल्या डोळ्यांदेखल असा इतिहास बनत असताना पाहतो तेव्हा जीवन धन्य होतं. अशी ऐतिहासिक घटना राष्ट्रजीवनाची चिरंजीव चेतना होऊन जाते. हा क्षण अविस्मरणीय आहे. हे क्षण अभूतपूर्व आहे.हे क्षण विकसित भारताच्या शंखनादाचा आहे. हा क्षण नव्या भारताचा जयघोषाचा आहे. हा क्षण अडचणींच्या महासागराला पार करण्याचा आहे. हा क्षण १४० कोटी लोकांच्या सामर्थ्याचा आहे. हा क्षण भारतात नवी ऊर्जा, नवा विश्वास, नव्या चेतानाचा आहे. हा क्षण भारताच्या उदयमान भाग्याच्या आवाहानाचा आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“अमृत वर्षाचा पहिल्या टप्प्यात यशाचा वर्षाव झाला आहे. आम्ही पृथ्वीवर संकल्प केला आणि तो संकल्प चंद्रावर साकार केला. वैज्ञानिक सहकाऱ्यांनीही सांगितलं की इंडिया इज ऑन मून. आज आपण आंतरिक्षमध्ये नव्या भारताच्या नव्या उड्डाणाचे साक्षीदार बनलो आहोत. मी या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण अफ्रिकेत आहे. परंतु, प्रत्येक देशवासियांप्रमाणे माझं मन चंद्रयान अभियानात लागलं होतं. नवा इतिहास बनताच प्रत्येक भारतीय उत्साहात बुडाला. प्रत्येक घरात उत्सव सुरू झाला. हृदयपूर्वक मी ही आपल्या देशवासियांसह आणि कुटुंबासह उल्हास आणि आनंदाने सहभागी झालो आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“आजपासून चंद्राशी संबंधित मिथक बदलणार आहे. कथानकही बदलणार आहेत. नव्या पिढीसाठी म्हणीही बदलणार आहेत. भारतात आपण सर्वजण पृथ्वीला आई संबोधतो. चंद्राला मामा म्हणतो. पूर्वी म्हटलं जायचं की चंदा मामा खूप लाबंचे आहेत. आता एक दिवस असाही की लहान मुलं म्हणतील की चंद्रमामा दूरवर आहे”, असं ते म्हणाले.