- कामगार नेते बाबा कांबळे यांचा पुराव्यानिशी आरोप..
- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना धाडले निवेदन; चौकशीची केली मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑगस्ट 2023) :- गोरगरीब, कष्टकरी, बांधकाम मजुरांसाठी स्थापन करण्यात आलेल्या रस्ते व बांधकाम कल्याणकारी महामंडळामध्ये ३१४ कोटी कपाट खरेदी टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वी देखील मध्यान भोजन योजना, बोगस लाभार्थी योजनासह इतर विविध योजनेमध्ये १००० करोड रुपयांचा घोटाळा झाल्याचे आरोप झाले होते’ परंतु याची चौकशी न झाल्यामुळे व संबंधित घोटाळ्यातील कोणावरही कारवाई झाली नाही. परंतु, आता मात्र, पुन्हा एकदा ३१४ कोटीच्या टेंडरमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे पुराव्यानिशी आरोप करण्यात आले आहेत.
अडीच लाख रुपये किमतीचे कपाट पंधरा लाखापेक्षा अधिक किमतीमध्ये खरेदी करण्यात आले आहेत. हे सर्व प्रकरण अत्यंत गंभीर असून गोरगरीब कष्टकरी बांधकाम मजुरांसाठी स्थापन करण्यात आलेल्या बांधकाम मजुरांच्या कल्याणकारी मंडळामध्ये अशा प्रकारे लाखो करोडोंचे घोटाळे होणं हे अत्यंत दुर्दैवी व बांधकाम मजुरांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार आहे. या सर्व प्रकरणाची ताबडतोब चौकशी करून यातील दोषीवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष, कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. तशा प्रकारचे पत्रदेखील संघटनेच्या वतीने देण्यात आले असून अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी बाबा कांबळे यांनी दिला आहे.
कष्टकरी कामगार बांधकाम मजुरांचे प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत असून पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये बांधकाम मजुरांचे सातत्याने अपघात होत आहेत. तसेच त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ होत नाही व बोगस लाभार्थी मात्र या योजनेचा लाभ घेत आहेत. खऱ्या लाभार्थ्यांना मात्र, दुर्लक्षित ठेवले जात आहे. पुणे, मुंबईमध्ये बांधकाम मजुरांच्या अनेक दुर्दैवी घटना घडल्या असून त्यामध्ये अनेक बांधकाम मजुरांचे जीव देखील गेलेला आहे, असे असताना बांधकाम मजुरांच्या कल्याणासाठी उपलब्ध असलेला निधी हा बांधकाम मजुरांवरच खर्च करण्याऐवजी या निधीचा दुरुपयोग सुरू असून या निधीचा इतर विविध कामासाठी उपयोग केला जात आहे. त्यामध्ये हॉस्पिटल बांधणे, इमारती बांधणे, कपाट खरेदी करणे व इतर विविध कारणांसाठी या निधीचा उपयोग केला जात आहे. मुळात हा निधी बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी व त्यांच्या योजनासाठी राबवला जावा; ही महत्त्वाची भूमिका दुर्लक्षित झालेली आहे.
या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेऊन बांधकाम मजुरांच्या कल्याणकारी मंडळामध्ये झालेल्या घोटाळ्याची ताबडतोब चौकशी करावी, अशी मागणी यावेळी कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. याबरोबरच बांधकाम मजुरांमध्ये याबाबत जागृती व्हावी व त्यांच्या योजनांचे हक्काचे पैसे इतरत्र वापरले जात आहेत; याबद्दल बांधकाम मजुरांमध्ये जनजागृती करणार असल्याची माहिती बाबा कांबळे यांनी दिली.












