- आमदार महेश लांडगे यांची शिष्टाई कामाला..
- मावळच्या आजी आणि माजी आमदारांचे धोरण गुलदस्त्यात..
- महापालिका आयुक्तांकडून देखील स्वागत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ सप्टेंबर २०२३) :- पवना धरणातून सेक्टर क्र. २३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणी आणण्यासाठी थेट पाईपलाईन प्रकल्पावरील सन २०११ मधील “जैसे थे” चे आदेश राज्य शासनाने मागे घेतले आहेत. त्यामुळे १२ वर्षांनी बंद जलवाहिनी प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बंदी उठविल्याचे पत्र शासनाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी-छापवाले यांनी महापालिका आयुक्तांना पाठविले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याच्या प्रकल्पाचे काम सन २००८ मध्ये सुरु केले होते. प्रकल्पाला मावळमधील ग्रामस्थांनी विरोध करत आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला होता. यामध्ये तीन शेतकरी शहीद झाले. या आंदोलनानंतर २०११ मध्ये तत्कालीन राज्य सरकारने या प्रकल्पला स्थगिती देत जैसे थेचा आदेश दिला होता.
त्यामुळे सुमारे १७० कोटी रुपयांचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नुकसान होण्याचा धोका होता. हा प्रकल्प मार्गी लागल्यास शहराचा किमान २०५० पर्यंतचा पाणीप्रश्न सुटणार आहे, अशी ठाम भूमिका आमदार महेश लांडगे यांनी मांडली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शहर दौऱ्यावर असताना बंदी उठविण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार ८ सप्टेंबर रोजी शासनाने स्थगिती उठविली आहे.
पिंपरी- चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या याचा विचार करता आगामी ५० वर्षांचा विचार करुन नवीन जलस्त्रोत निर्माण करण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे आंद्रा व भामा आसखेड प्रकल्पातून २६७ एमएलडी पाणी उपलब्ध होण्यास चालना मिळाली. आता पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाचे काम आता प्रशासनाने लवकरात लवकर सुरू करावे आणि पिंपरी चिंचवड प्रचारांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी अपेक्षा आहे. तसेच पिंपरी चिंचवडकरांच्या हिताचा विचार करून राज्यातील महायुती सरकारने हा महत्वकांक्षी निर्णय घेतल्याबद्दल पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने राज्य सरकारचे आभार व्यक्त करतो.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा.पवना बंद जलवाहिनी योजनेवरील स्थगिती उठविल्यानंतर आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह म्हणाले, ‘’पिंपरी चिंचवड सारख्या झपाट्याने वाढणार्या शहरात स्वच्छ आणि सतत पाणी पुरवठा करणे ही काळाची गरज आहे. पवना बंद जलवाहिनी योजनेवरील स्थगिती १२ वर्षांनंतर उठली हे महापालिकेसाठी एक निर्णायक वळण आहे. नागरिकांसाठी ही आनंदाची बाब असून शहराचा विकसनशील शाश्वत मार्ग मोकळा करण्यात आणि पाणीपुरवठ्याच्या समस्या दूर करण्यास यामुळे मदत होईल, तसेच महापालिका विविध प्रकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने निर्णायक पाऊले उचलण्यास प्रयत्न करेल.’’
– महापालिका आयुक्त – शेखर सिंह…
याबाबत मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके आणि माजी आमदार बाळा भेगडे यांच्याशी संपर्क साधला होता. दरम्यान कार्यक्रमात व्यस्त असून नंतर संपर्क करतो, असे उत्तर त्यांच्याकडून मिळाले. त्यामुळे त्यांचे धोरण अद्याप गुलदस्त्यात आहे की काय अशी शंका निर्माण होते.