- खासदार बारणे यांनी साधला आयटी अभियंत्यांशी संवाद
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ एप्रिल) :- लोकशाहीला बळकटी आण्यासाठी, राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाच्या उज्वल भविष्यासाठी शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीला मतदान करावे, अशा प्रतिक्रिया पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील आयटी अभियंत्यांनी व्यक्त केली.
शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (रविवारी) आयटी अभियंत्यांशी संवाद साधला.
यावेळी शहर प्रमुख योगेश बाबर, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, उर्मिला काळभोर, सरिता साने, अनिता तुतारे, कमल गोडांबे, शर्वरी जवळकर, शिल्पा अल्पन, श्वेता कापसे, अंजना अठन्नी, सोमनाथ गुजर आदी उपस्थित होते.
खासदार बारणे यांनी पिंपळे सौदागर भागात रविवारी प्रचार दौरा केला. रहाटणी येथील धर्मवीर संभाजी महाराज उद्यानात फेरी मारून मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. खासदार बारणे यांनी मागील पाच वर्षात पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय, पवना धरणातील १ लाख २५ हजार घन मीटर गाळ काढून धरणात पाणीसाठा वाढवला, यांसारखी सक्रिय कामे केली असल्याचे बारणे यावेळी म्हणाले
पुढील काळातही अशाच प्रकारची कामे करण्यासाठी तसेच संसदेत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचे सरकार आणण्यासाठी महायुतीचे उमेदवार बारणे यांना विजयी करण्याचे ठरवले आहे, अशा भावना उपस्थित आयटी अभियंत्यांनी व्यक्त केल्या. मतदानाच्या दिवशी सुट्टीवर न जाता विकासाचे राजकारण देशात सुरू करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणार. सर्व नागरिकांनी मतदान करून योग्य सरकार निवडल्यास लोकशाहीला बळकटी मिळेल. देशाची सुरक्षा, शांतता आणि आत्मसन्मान वाढविण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे आवश्यक आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि महायुतीच्या पक्षांमध्ये भारताचे स्वास्थ्य सुधारण्याची ताकद आहे, असेही आयटी अभियंत्यांनी म्हटले.










