न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२३) :- कोणता समाज किती टक्के आहे? याबद्दलची माहिती मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. कोणत्या जातीचे किती लोक आहेत, हे एकदा लोकांना कळू द्यावे. त्याचे चित्र पुढे ठेवल्यानंतर जो सगळ्यात दुबळा आहे. त्याच्यासाठी देशाची, राज्याची शक्ती वापरण्याची आज ख-या अर्थाने आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
भारतीय भटके विमुक्त प्रतिष्ठान संघाच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या हस्ते पवार यांना मानपत्र अर्पण करण्यात आले. दापोडीतील कार्यक्रमाला संघाचे अध्यक्ष शिवलाल जाधव, कार्याध्यक्ष भारत जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, तुषार कामठे उपस्थित होते.
पवार म्हणाले, भटक्या विमुक्तांचे प्रश्न अनेक असून आजचे राजकर्ते या प्रश्नांबाबत किती जाणकार, जागरुक आहेत. प्रश्नांची सोडवणूक करण्याची भावना त्यांच्या अंतकरणामध्ये कितपत आहे. याबद्दल शंका व्यक्त करावी अशी स्थिती आहे. राज्यकर्त्यांचा या प्रश्नांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. एकेकाळी सोलापूर, बारामतीत भटक्या समाजातील घटकांना गुन्हेगार ठरवून त्यांना तारांच्या कुंपनात ठेवले जात होते. स्वातंत्र्याच्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी सोलापूरमध्ये जाऊन कुंपनाच्या तारा तोडल्या. तुम्ही आजपासून विमुक्त आहात. गुन्हेगार नाहीत असे सांगितले. आमच्याकडे सत्ता असताना जाणीवपूर्वक सवलती दिल्या. आजही फार मोठा वर्ग एका वेगळ्या स्थितीत राहत आहे. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. पण, त्यासाठी राज्यकर्त्यांची मानसिकता बदलली पाहिजे.
आदिवासींना वनवासी म्हटले जाते. आदिवासी या देशातील संस्कृतीचा घटक आहे. पाणी, जंगल, जमीन या सगळ्याचा आदिवासी मालक आहे. त्यांना तुम्ही या मार्गाने जा, पूजा अर्चा करा अशा प्रकारची भूमिका सांगितली जाते. ही भूमिका मान्य नसल्याचे आदिवासी तरुणांनी शिवनेरीच्या पायथ्याशी माझ्यापुढे मांडली आहे, असेही ते म्हणाले.













