न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२३) :- ग्रामपंचायत कर्मचा-यांची वेतनश्रेणी, निवृत्तीवेतन व इतर प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मावळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचा-यांनी सोमवारपासून तीन दिवस कामबंद आंदोलन केले होते. दरम्यान, यासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, आंदोलनामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींचे कामकाज विस्कळित झाले होते.
मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे अध्यक्ष गणेश वाळुंजकर, उपाध्यक्ष जीवन गायकवाड, सचिव सुखदेव गोपाळे, खजिनदार राजेंद्र कांबळे, राजेंद्र बाघोले, योगीराज भालेकर, कैलास मुर्डे, मारुती घरदाळे आदींनी पंचायत समिती कक्ष अधिकार्यांची भेट घेऊन निवेदन दिले. राज्यात प्रथमच ग्रामपंचायत स्तरावर कामकाज करणान्या सर्व कर्मचारी संघटना त्यामध्ये ग्रामसेवक युनियन, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, ग्रामरोजगार सेवक संघटना, अखिल भारतीय सरपंच परिषद आदींचा या आंदोलनात सहभाग होता.
विकासाचा महत्वाचा भाग असूनही ग्रामपातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या सातत्याने प्रलंबित ठेवल्या जात आहेत. राज्यातील २८,८१३ ग्रामपंचायतीमध्ये वरिष्ठ लिपिक, लिपिक, संगणक चालक, करवसुली कर्मचारी, सफाई कामगार, पाणीपुरवठा कामगार, बीजपुरवठा कामगार आदी पदावर काम करीत असलेले एक लाख चाळीस हजार कामगार कमी वेतनात काम करीत आहेत. कर्मचार्यांच्या विविध मागण्या बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहेत.
याबाबत आंदोलन, मोर्चा, मेळावे करूनही अद्यापपर्यंत कुठलीही मागणी मंजूर झालेली नाही. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतिबंध लागू करावा व नियमित कर्मचार्याप्रमाणे वेतन श्रेणी लागू करावी. ग्रामपंचायत कर्मचार्यांना १९७२ च्या पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी लागू आहे. परंतु, ते फक्त ५० हजार रुपये इतके आहे. त्यामध्ये वाढकरण्यात यावी, तसेच, दहापैक्षा कमी कर्मचारी असणार्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी (उपदान) लागू करण्यात यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.