न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२४) :- सुदुंबरे गावातील तुलसी आंगण सोसायटी परिसरात रस्त्यावरील आणि सोसायटीतील बंद अवस्थेतील पथदिव्यांअभावी नागरिकांची कुचंबणा होत आहे. काही पथदिवे खांबावरून गायब झाले आहेत. सोसायटी परिसरात कामगार वर्ग वास्तव्यास असून शेजारीच शाळा देखील आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडे सोसायटीतील नागरिकांनी पथदिव्याबाबत अनेकवेळा तक्रार केली. परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
रात्रीच्या वेळी ये-जा करताना येथील अनेकांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो. सापदेखील आडवा जातो. तसेच इतर जंगली प्राण्यांची देखील भीती आहे. परिसरातील कुत्री नागरिकांच्या अंगावर धावून येत आहेत. अंधारातून मार्ग काढताना प्रवाशांना अपघाताचा धोका आहे.
परिसराला लागुनच चाकण एमआयडीसीचे औद्योगिक क्षेत्र आहे. त्यामुळे दिवसभरासह रात्री देखील येथील कामगार वर्ग ये-जा करीत असतो. रात्रीच्या वेळी त्यांना सुरक्षितपणे ये-जा करता यावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तुलसी आंगण सोसायटीच्या आवारात ग्रामपंचायतिने महावितरणच्या खांबावरील पथदिवे त्वरित दुरुस्त अथवा नवीन बसवावेत, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.