- आमदारांवरील टांगती तलवार मात्र हटली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२४) :- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे आमदारांचे बहुमत आहे. पक्षाची संघटनात्मक रचना किंवा पदर चनेनुसार कोणता गट हा पक्ष हे निश्चित होत नाही. त्यामुळे अजित पवार यांच्याकडील बहुमतानुसार अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी दिला. त्याचबरोबर आमदार अपात्रतेसंदर्भातील सर्व याचिका फेटाळून लावल्याने शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांचे आमदार पात्र ठरले आहेत.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सात महिन्यांपासून राष्ट्रवादी कुणाची? यावरून सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू होती. अजित पवार यांच्याकडे विधानसभेतील ५३ पैकी ४१ आमदारांचा पाठिंबा आहे. शरद पवार गटाने दाखल केलेल्या अपात्रता याचिकेतही ४१ आमदारांच्या निलंबनाची मागणी केली होती. अजित पवार यांच्याकडे बहुमत असल्याचे लक्षात येते. पक्षाची घटना आणि घटनेनुसार असलेली पक्षनेतृत्वाची रचनेवर पक्ष कुणाचा, याचा निर्वाळा देता येणार नाही. बहुमताच्या निकषानुसार अजित पवार यांची खरी राष्ट्रवादी असल्याचे नार्वेकरांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटाने बंडखोरी केली किवा पक्ष नेतृत्वाविरोधात काम केले असे म्हणता येणार नाही, त्यामुळे घटनेतील पक्षांतरबंदीविषयीच्या १०व्या सूचीनुसार कारवाई करता येत नसल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. यानुसार दोन्ही गटांच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता येत नसल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. पक्षांतर्गत मतभेदातून दोन गट तयार झाले होते. पक्षाच्या नेतृत्वाशी त्यांचे मतभेद होते, त्या मतभेदाच्या विरोधात अजित पवार व त्यांच्या समर्थक आमदारांनी नाराजी नोंदवली होती. नेतृत्त्वाच्या निर्णयाविरोधात किवा भूमिकेविरोधात नाराजी व्यक्त करणे म्हणजे पक्षात फूट पडली, असे होत नाही. याचा १० व्या सूचीसाठी दुरुपयोग करता येणार नाही, असे सांगताना त्यांनी कर्नाटकमधील निकालाचा हवाला दिला.