- डोंगर आणि झाडाशिवाय जमीनीत पुरेसे पाणी साठवणे अशक्य..
- त्यामुळे जपा ”झाडे लावा, झाडे जगवा आणि पाणी वाढवा” हा मूलमंत्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२४) :- डोंगर हे जमिनीतील पाणीसाठ्याचे बाह्य कवच असते. उन्हाळ्यात डोंगराचे बाह्य आवरण तापते. माञ भूपृष्ठापर्यंत उष्णता पोहचू न शकल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. या उलट डोंगर फोडला तर उष्णता थेट पोहचते व डोंगराच्या पोटातील ओलावा संपुष्टात येतो.
पाणी जमिनीत दोन प्रकारे साठले जाते. एक मृत साठ्याचे पाणी. दुसरे जिवंत साठ्याचे पाणी. मृत साठ्याचे पाणी हे दहा फुटावर पाझरते तर जिवंत साठ्याचे पाणी दहा ते १०० व त्यापेक्षा अधिक पाळीवर आढळते. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा नदी नाल्याचे पाणी मृत साठ्याच्या स्वरूपात जमिनीत साठले जाते. जे कि एकदा उपसले कि संपून जाते आणि जोपर्यंत ओढे वगळ वहात असतात तोपर्यंतच विहीर व बोअरला पाणी असते. तर जिवंत साठ्याचे पाणी आज तरी भूगर्भातून संपलेले आहे. कारण जिवंत पाणी खोलवर जाण्यासाठी नैसर्गिक यंञणा हवी असते.
एक पाण्याचा थेंब खडकातून पाझरून भूगर्भात जाण्याठी एक वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजेच दहा फुटावर जाण्याठी दहा वर्ष लागतात. एक झाड एका दिवसाला ५० फुटावर दहा लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते. कारण झाडं हे जमिनीच्या वर जेवढ्या उंचीपर्यंत असेल तेवढीच खोलवर त्याची मुळे असतात. म्हणून झाडं हे निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन आहे. एक लिंबाचे झाडं दहा हजार लिटर पाणी एकुण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते. याचा अर्थ आपल्या परिसरात किमान ३० झाडं लिंब, चिंच, जांबळ, अंबा, मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असतील. म्हणून मृत साठ्याचे पाणी पाझरत रहात असावे. एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाडं एका हंगामासाठी एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते. ते ही पन्नास फुटाच्या ही खाली. वडाची व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात.
एक कोटी लिटर म्हणजे एका विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो. म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा.
आपण एका बोअरवेलसाठी एक लाख खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख खर्च करतो. पण पाण्याची कुठलीच शाश्वती नाही. कारण आपली नियत ही धुर्त असते. डोंगर संपुष्टात आणण्याची, डोंगरावरील झाडं तोडण्याची, बांध संपवून बोडके करण्याची म्हणून पाणी तरी कुठून येणार? पाण्याचे दुर्भिक्ष हे मानव निर्मित आहे. देवाला दोष देण्यात अर्थ नाही. खरे दोषी आपण व आपला स्वार्थ आहे.
” झाड नसेल तर हवा रोगट होते. पाणी विषासमान होते आणि माती वांझ होवून शापीत होते. झाडांचं मूल्य समजून घ्या आणि दहा रूपयाचं फक्त एक झाडं शेत असेल तर शेतात, नाहीत तर, माळरानावर, डोंगरावर कुठे ही जगविण्याची जबाबदारी घ्या. याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नाही. तुम्ही गावाचे, शहराचे, देशाचे, समाजाचे आणि स्वहिताचे जर काही देणं लागत असाल तर एवढचं साध काम करा. झाडं मानसाचं मन, मस्तिष्क व जीवन हिरवगार करत असतात. एक सदैव लक्षात असु द्या. झाडांची पाणी पाठवण्याची व वाहण्याची क्षमता त्यांच्या वयावर व प्रकारावर अवलंबून असते. शक्यतो देशी झाडे लावा”.
– मा. वृक्षमित्र अरुण पवार (श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय वृक्षमित्र महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त)…