- सीसीटीव्ही आणि स्पीडगनच्या माध्यमातून वाहनचालकांवर लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२४) :- अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी महामार्ग पोलिसांकडून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यात कारला समतल भागात १००, तर घाट परिसरात ६० वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ही वेगमर्यादा पूर्वीपेक्षा अधिक असल्याने वाहने आता वेगाने धावणार आहेत. या मर्यादेचे उल्लंघन केल्यास वाहनचालकांवर सीसीटीव्ही आणि स्पीडगनच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
पुणे-मुंबई-पुणे अंतर कमी करण्यासाठी या एक्स्प्रेस वेची म्हणजेच यशवंतराव चव्हाण दुतगती मार्गाची निर्मिती करण्यात आली. मात्र, या मार्गावर गेल्या काही वर्षांपासून ठोस पावले उचलली जात आहेत. त्यामुळे मागील वर्षात महामार्गावरील अपघात घटल्याचे समोर आले. यात आणखी घट होऊन एक्स्प्रेसवेवरील अपघात शून्य करण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) सुखविंदर सिंगा यांनी दिले. त्यानुसार आता पुणे-मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर वेग मर्यादेची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.
पुणे-मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा एकूण ९४ किलोमीटरचा असून, या महामार्गावर ३५ ते ५२ किमी या टप्प्यामध्ये घाटभाग म्हणजेच बोर घाट आहे. सद्यःस्थितीत या दुतगती महामार्गावरील समतल भागासाठी असलेली वेगमर्यादा १०० किलोमीटर प्रतितास असून, घाटभागामध्ये आल्यानंतर वेगमर्यादा ५० किलोमीटर प्रतितास आहे. मात्र, घाटभागातील ही वेगमर्यादा हलक्या वाहनांसाठी अत्यंत कमी असून, पुणे ते मुंबई वाहिनीवर अतितीव्र उतार आहे. समतल भागातून १०० किलोमीटर प्रतितास याप्रमाणे प्रवास केल्यानंतर घाटभागात आल्यावर वाहनाची वेगमर्यादा ५० किलोमीटरवर आणताना वाहनचालकांना अडचणी निर्माण होतात. तसेच, त्यादरम्यान वाहनचालकाने वाहनांचा वेग जलदगतीने कमी केल्याने अनेक अपघात घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वाहनांच्या वर्गानुरूप वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.