न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२४) :- गेल्या दोन निवडणुकांमध्ये जी लाट होती, ती यंदा नाही. केंद्र सरकारच्या विरोधात लोकांमध्ये रोष आहे. त्यामुळे या वेळची लोकसभा त्रिशंकू होईल आणि एकहाती सत्ता येणार नाही, असा दावा ज्येष्ठ गांधीवादी नेते व युक्रांदचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केला.
काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. सप्तर्षी म्हणाले की, देशात पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. त्या आकडेवारीवरून तर केंद्र सरकारच्या विरोधातील लाट दिसत आहे. ‘इस बार चारशे पार’, पण त्यांना चारशे पार जागा हव्यात कशाला? बहुमतापेक्षा अधिक जागा त्यांना हव्यात, हे ऐकूनच धडकी भरते.
डॉ. सप्तर्षी म्हणाले, देश विविध संस्कृतींचा, जातींचा, धर्माचा आहे. केवळ हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही. खरंतर ‘आरएसएस’ला हिंदू राष्ट्र घडवायचे आहे आणि विशिष्ट विचारसरणीचा माणूस तयार करायचा आहे. जे या देशात शक्य नाही. नागरिकांनी ते होऊ देऊ नये. संविधान, लोकशाही वाचविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. भाजपमाये ३० टक्के लोक इतर पक्षांकडून आले आहेत. उमेदवार आयात केल्याने पक्षांतर्गत संघर्ष सुरू आला आहे. खरंतर भाजपमध्ये कोणी मोठा होऊ लागला की, त्याला मोडीत काढले जाते. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे, शिवराजसिंह चौहान आदींचा समावेश आहे. राजकारण म्हणजे व्यापार झाला असून, महाराष्ट्रात त्याचे व्यापारीकरण अधिक झाले आहे. ‘तुम्ही आमच्याकडे या, नाहीतर जेलमध्ये जा’ अशी धमकी देत आहेत.
पुण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची एक परंपरा आहे. पुण्यात ज्या पक्षाचा खासदार होतो, त्याच पक्षाचे सरकार केंद्रामध्ये येते. उदा. सुरेश कलमाडींपासून ते अनिल शिरोळे आणि गिरीश बापटपर्यंतचा इतिहास पाहा. यंदा महाविकास आघाडीचा उमेदवार येण्याची शक्यता आहे, असे भाकीत डॉ. सप्तर्षी यांनी केले.