- पाण्याचा जपून अनं काटकसरीने वापर करा; आधीच मिळतेय दिवसाआड पाणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मे २०२४) :- पवना धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. धरणात सोमवारी (दि. २९) पर्यंत ३४ टक्के पाणीसाठा होता. तापमानाचा पारा ४० डिग्रीवर गेल्याने पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. त्यातच पाण्याची मागणी देखील वाढळी आहे. हे पाणी १५ जुलैपर्यंतच पुरेल असा दावा पाटबंधारे विभागाने केला आहे. पावसाळा लांबल्यास पिंपरी-चिंचवड शहरावर पाणी संकट उभे राहण्याची दाट शक्यता आहे.
एकट्या पिंपरी-चिंचवड महापालिकेस सर्वाधिक ५१३ एमएलडी पाणी दिले जाते. हे पाणी पवना नदीत सोडले जाते. शहरासाठी पवना नदी पात्रातील रावेत बंधारा येथून पाणी उचलले जाते. निगडीतील जलशुध्दीकरण केंद्रात पाइपलाइनद्वारे पाणीसाठा करून त्यावर शुध्दीकरण प्रक्रिया केली जाते. येथून शहराच्या विविध भागातील जलकुंभात पाणी वितरित केले जाते. गेल्या साडेचार वर्षांपासून शहराला दिवसाआड पुरवठा केला जात आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने अनेक मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांना विकत पाणी घ्यावे लागते. त्यांचा आर्थिक भुर्दंड सोसायट्यांना सहन करावा लागत आहे.
पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा. घरातील भांड्यात ठेवलेले शिल्लक पाणी फेकून देऊ नये. पिण्याचे पाणी हे वाहने स्वच्छ करणे, बागकाम व कुंड्यासाठी, घर किंवा इमारत व परिसर स्वच्छ करण्यासाठी, धुण्यासाठी वापरू नये. पाऊस लांबल्यास पाणी कमी पडू नये म्हणून नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची बचत करावी, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले आहे.