न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मे २०२४) :- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्राधिकरण) वतीने इयत्ता दहावी आणि बारावीमधील नापास विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय आवश्यक साहित्य व सरावासाठी प्रश्नपत्रिका निर्मिती करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.
इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांच्या निकालांचे निरीक्षण केले असता, नापास विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी काही सूचना अधिकारी यांना दिल्या आहेत. नापास विद्यार्थ्यांना निकाल लागल्याबरोबर पुढील पुरवणी बोर्ड परीक्षेची तयारी करून घेणेसाठी आवश्यक साहित्य व प्रश्नपत्रिका तयार करून देणे गरजेचे आहे.
दहावी व बारावी बोर्ड संदर्भातील संबंधित विषयाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावा लागेल. निकाल लागण्यापूर्वी संबंधितांना कार्यशाळेस बोलावले जाणार आहे. यात विषयाच्या जास्तीत जास्त भागावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर किंवा संबंधित आशयावर भर देवून आवश्यक साहित्य व प्रश्नपत्रिका निर्मिती केली जाणार आहे. नापास मुलांना पास होण्यासाठी आवश्यक संकल्पना स्पष्ट होतील व दरम्यानच्या कालावधीत त्याचा पुरेसा सराव होईल या पद्धतीने साहित्य तयार करावयाचे आहे.
वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांबाबतचा आशय ठरवून घ्यावा. मुख्य संकल्पना तंत्रे, पद्धती यांची सोप्या पद्धतीने मांडणी करावी. त्यावर आधारित नमुन्यादाखल काही उदाहरणे सोडवून द्यावीत. सरावासाठी काही प्रश्न द्यावेत. बोर्ड पॅटर्न नुसार एक प्रश्नपत्रिका तयार करून नमुना उत्तरे द्यावीत, अशा सूचना विद्या प्राधिकरणाने दिल्या आहेत.