गैरसोयींमुळे हिंजवडीस्थित ३७ कंपन्या परराज्यात स्थलांतरीत..
राष्ट्रवादी (शरद पवार) युवक काँग्रेसकडून महायुती सरकारचा निषेध…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे २०२४) :- हिंजवडी आयटी पार्क येथील ३७ कंपन्या परराज्यात गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुंबई प्रदेश कार्यालय येथे राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार मुंबई येथील पक्ष कार्यालय येथे युवक प्रदेशअध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. “महाराष्ट्रातील युवकांना बेरोजगार करण्याऱ्या सरकारचा धिक्कार असो, रोजगार आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा” अशा घोषणा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने यावेळी देण्यात आल्या.
यावेळी बोलताना मेहबूब शेख म्हणाले “युवकांना दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याच्या पोकळ बाता करणाऱ्या सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे नवीन नोकऱ्या तर सोडा पण, आज आहेत त्या नोकऱ्या गमावण्याची वेळ महाराष्ट्रमधील युवकांवर आली असून सरकारने युवकांना वाऱ्यावर सोडून दिले असल्याचं ते म्हणाले. वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरातील दीड लाखाहून अधिक स्थानिक युवकांना रोजगारास मुकावे लागले होते ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा सरकारच्या चुकीमुळे हिंजवडी आयटी पार्क येथिल ३७ कंपन्या परराज्यात गेल्याच्या घटनेंने पुणे-पिंपरी चिंचवड शहरातील तरुणांना पुन्हा नोकऱ्या गमावण्याची नामुष्की ओढवली आहे. यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले.
युवक शहर अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले ” शरद पवारांनी राजीव गांधी आयटी पार्क वसवून संपूर्ण देशातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम केले. यामुळे हिंजवडी आयटी पार्क परिसर तसेच लगतचे पिंपरी चिंचवड शहराला मेट्रोसिटीचे रूप प्राप्त झाले. तसेच लाखो तरुणांना रोजगार मिळाला. सरकारचा चुकीच्या धोरणामुळे आहेत ते रोजगार भाजप काळात गमवण्याची पाळी स्थानिक तरुणांवर आली आहे. याचा आम्ही निषेध करतो.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, पिंपरी चिंचवड शहराचे युवक शहराध्यक्ष इमरान शेख, कार्याध्यक्ष सागर तापकीर,तसेच मुंबई प्रदेश पदाधिकारी निलेश भोसले प्रवक्ते,प्रमोद बागल,विक्रम खामकर,उमेश अग्रवाल, शहभाज पटेल,अमित हिंदळकर,सुमित पाटील गुरुदत्त सिंग,राज जोशी, रॉबिन, योगेश,इरफान दिवटे सचिन नारकर,ट्विंकल परमार,श्रेयस लोखंडे शहबाज खान उबेद साबरी,रजनीकांत गायकवाड अनिकेत बिरंगल आणि मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी उपस्थित होते.