न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२४) :- राज्यातील आगामी विधानसभा निवडणूका एकाच टप्प्यात घ्याव्यात, अशी मागणी महायुतीतील शिंदेसेना आणि अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केली. कमी टप्प्यात मतदान घ्या, अशी उद्धव सेनेचीही मागणी आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली पथक मुंबईत दाखल झाले असून या पथकाने शुक्रवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची स्वतंत्र भेट घेऊन त्यांच्या सूचना जाणून घेतल्या.
लोकसभा निवडणूक कमी टप्प्यात घेण्याची मागणी त्यावेळी काँग्रेसने केली होती. मात्र आयोगाने हा आपला अधिकार असल्याचे उत्तर दिले होते. त्यामुळे यावेळी आमच्या पक्षाने यासंदर्भात मागणी केली नसून निवडणुका वेळेवर घ्या अशी मागणी केल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस मुनाफ हकमी यांनी सांगितले. तर निवडणुका शक्य तितक्या कमी टप्प्यात घ्याव्यात अशी मागणी उद्धव सेनेतर्फे सुभाष देसाई यांनी केली.
गृहनिर्माण संस्थेतील मतदान केंद्रांना काँग्रेसने विरोध केला. भाजपने मात्र गृहनिर्माण संस्थेत मतदान केंद्र असावीत अशी सूचना आयोगासमोर मांडली आहे.उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा ४० लाखावरून ६० लाख करा अशी मागणीही शिंदेसेना व अजित पवार गटाने केली.
कोणाकडून कोणी, काय मांडले मुद्दे?
भाजप : आशिष शेलार, मिहीर कोटेचा :- रांग टाळण्यासाठी प्रत्येक बूथवर एक हजारपेक्षा जास्त मतदार नसावेत. मतदानाचा दिवस सलग सुट्ट्यांच्या दिवशीचा असू नये. मतदान केंद्रावर मोबाईल व बँगला बंदी घालू नये, टोकनची व्यवस्था असावी.
शिंदेसेना : राहुल शेवाळे : मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात. ज्येष्ठ मतदार वयोमर्यादा ८० वरून ८५ करावी. होर्डिंगवरील कर राज्यभरात समान ठेवावेत.
अजित पवार गट : मंत्री अनिल पाटील, आ. शिवाजीराव गर्जे :- सोशल मिडिया अपप्रचार प्रकरणी लगेच कारवाई हवी. खातरजमा करूनच उमेदवारावर कारवाई करावी.
काँग्रेस : मुनाफ हकीम, गजानन देसाई : वादग्रस्त, सरकारी पक्षाला मदत करणारे अधिकारी नकाे. पोलीस महासंचालक रश्मी शुल्का यांना हटवा. दीर्घ काळ एकाच ठाण्यात असलेल्या पोलिसांना बदला.
उद्धवसेना : सुभाष देसाई – ज्येष्ठ मतदारांच्या सुखसोयींना प्राधान्य द्यावे.
शरद पवार गट : रवींद्र पवार :- पिपाणी चिन्ह रद्द करा. सोशल मिडियातील फेक पोस्टवर अंकुश ठेवावा.












