न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०१९) :- पिंपरी-चिंचवड शहरात गॅस रिफिलिंग करताना तीन घटना घडून पाच जणांचा बळी गेला आहे. तर, अनेकजण भाजले आहेत. त्यामुळे गॅस रिफिलिंग करणा-या दुकानांवर कडक कारवाई करण्याची मागणी छावा संघटनेने केली आहे.
यासंदर्भात छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शहरातील गॅस सिलिंडरचा काळाबाजार हा माणसाच्या जीवावर बेतला आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ एप्रिल २०१९ रोजी गॅस रिफिलिंग करताना स्फोट होऊन दोघेजण भाजले. चिखली येथेही अशाच दुर्घटनेत महापालिकेच्या एका कर्मचा-याचा बळी गेला होता. काळेवाडीमधील स्फोटात चौघेजण मरण पावले होते.
छावा संघटनेने गेली अनेक वर्षे गॅस रिफिंलिंगवर कारवाईसाठी अन्न पुरवठा विभागाकडे पाठपुरावा केला आहे. परंतु, कारवाई अभावी रिफिलिंगचा धंदा बंद होण्याऐवजी वाढतच चालला आहे. भोसरी येथे भर चौकात रिफिलिंग होत आहे. चाकण येथे सुमारे ६० ते ७० दुकानांमध्ये रिफिलिंग केले जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे तीनशे गॅस रिफिलिंग करणारी दुकाने आहेत. त्यामुळे येथे काम करणा-या कामगारांसह परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात आहे. अन्न पुरवठा विभागाने हा जीवघेणा खेळ थांबवावा, अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा छावा संघटनेने दिला आहे.











