न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- व्यापारी व राजकीय हितासाठी गोरगरीब पथारी व्यावसायिकांच्या व्यवसायावर घाला घालण्याकरिता गेलेल्या मनपाच्या अधिकाऱ्यांना कारवाईकरीता लेखी आदेश नसल्यामुळे चांगलीच चपराक बसली.
शगुन चौक येथे पथारी, हातगाडीधारक व्यवसाय करतात. येथील काही व्यापारी व राजकीय व्यक्तींनी या पथारीवाल्यांची मनपाकडे तक्रार केली व परत या ठिकाणी पथारीधारक बसू नये याकरीता कम्पाउंड करण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी कारवाईकरीता घटनास्थळी दाखल झाले.
तात्काळ या घटनेची माहिती पंचायत अध्यक्ष व कामगार नेते बाबा कांबळे यांना संघटनेमार्फत मिळाली. बाबा कांबळे यांनी घटना स्थळी पोहचून मनपा अधिकाऱ्यांना कारवाई थांबविण्याची विनंती केली, परंतु अधिकाऱ्यांनी कोणतीही दादा न देता कारवाई चालूच ठेवली.
शेवटी संघटना व फेरीवाल्यांनी कम्पाउंड मारण्यास विरोध करत काम बंद पाडले व बेकायदेशीर कम्पाउंड रोखले. या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला व अधिकाऱ्यांनी प्रकरण पिंपरी पोलिसात नेले.
मनपा अधिकाऱ्यांकडे पोलिसांनी कायदेशीर परवानगी मागितली असता केवळ तोडी परवानगी असल्याचे अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. यावर कारवाईकरीता तोंडी परवानगी ग्राह्य धरता येत नसल्याचे पोलिसांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले व अधिकाऱ्यांना कारवाई थांबवण्यास सांगितले. त्यामुळे अधिकाऱ्यांना कारवाई थांबवत काढतापाय घेत पसार व्हावे लागले.
मनपास कारवाई माघार घ्यावी लागल्यामुळे फेरीवाल्यांनी संघटनेच्या फलकास पुष्पहार अर्पण करून आनंद व्यक्त केला. यावेळी रमेश शिंदे, प्रल्हाद कांबळे, धर्मराज जगताप, राजेश मायरमनी, आदी सहभागी झाले होते असे बाबा कांबळे यांनी सांगितले.