न्यूज पीसीएमसी नेटवर्क
लातूर :- किल्लारी भूकंप घटनेला आज बघता बघता २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. किल्लारीत झालेल्या भूकंपाने अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून सोडले होते. यामुळे आज सर्वपक्षीय नेते किल्लारीत दाखल झाले आहेत.
माणसे मोठ्या हिंमतीने उभे राहिले असल्याची भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली आहे. ही नैसर्गिक आपत्ती ओढवली त्यावेळी पवार हे मुख्यमंत्री होते. यानिमित्त नागरिकांनी पवारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोहळ्याचे आयोजन केले होते. यादरम्यान त्यांनी आठवणींना उजाळा दिला.
२५ वर्षांपूर्वी आलेल्या संकटांतून आपण सर्व बाहेर पडलो, असे शरद पवार यावेळी म्हणाले. प्रशासनाने मोठ्या कष्टाने दिवसरात्र मेहनत करून माणसे उभी केली असे म्हणत त्यांनी प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले.
त्यावेळी घटनास्थळी पोहोचले असता मृतांचा खच पडलेला होता. मृतांच्या नातेवाईकांना धीर देत होतो, परंतु ते चित्र मनावर खोल रुतलं गेलं होतं. एकांतात असताना आपसूकच डोळ्यात पाणी यायचं अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना वाट दिली.