न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १२ जानेवारी २०२६) :- छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचा मुलमंत्र देणाऱ्या तसेच मुत्सद्दीपणा, नितीमत्ता यांचा सुरेख संगम असलेल्या स्वराज्यप्रेरिका जिजाऊ माँसाहेब या थोर आदर्श राजमाता आहेत. सक्षम नेतृत्व घडवायचे असेल तर मूल्याधिष्ठित विचारांची पायाभरणी आवश्यक असते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. तर स्वामी विवेकानंद यांनी तरुणाईला केवळ स्वप्न पाहायला नाही, तर जबाबदारी घ्यायला शिकवले. आत्मविश्वास, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांवर आधारित सजग व कर्तव्यनिष्ठ नागरिक घडणे आवश्यक आहे, हे त्यांच्या विचारांतून स्पष्ट होते, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, त्यावेळी ते बोलत होते.
या अभिवादन प्रसंगी उप आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, डॉ. वर्षा घोगरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या भोईर, डॉ. विजया आंबेडकर,अभियंता संजीवनी मोरे,कार्यालय अधिक्षक मिनाक्षी गरूड,दूरध्वनी चालक विमल कांबळे तसेच विविध विभागातील महापालिका कर्मचारी उपस्थित होते.












