न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी:- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी लोकशाही मूल्ये देशात रुजावी याकरीता आपल्या तत्वांच्या आधारे तहहयात घालवली. आज त्यांची १५० वी जयंती. भाजप सरकार सत्तेवर येऊन आज चार-साडेचार वर्षे उलटली. जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून भाजपने सत्ता मिळवली खरी, परंतु भाजपच्या या सत्ताकाळात महागाई, समाजात जातीय तेढ, पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव गगनाला भिडले. बेरोजगारी वाढली असून सरकारच्या फसव्या घोषणा निकालात निघाल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या ‘मौन आंदोलनानिम्मित्त केले.
या मौन आंदोलनाचे लोन पिंपरी -चिंचवड शहरात दाखल झाले असून आज दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयासमोर मौन आंदोलन सुरु होते. शेती मालाला हमीभाव, शेतक-यांची फसवी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, कामगार धोरण, महिला व युवतींवरील अत्याचार, वाढती गुन्हेगारी इत्यादी विषयांवर राष्ट्रवादीने आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे दिसते.
यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, मा. आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर योगेश बहल, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका सुलक्षणा धर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, कविता खराडे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, प्रवक्ते फजल शेख, नगरसेविका संगीता ताम्हाणे, मा. नगरसेविका शमीम पठाण, निलेश पांढारकर, राजेंद्र साळुंखे, विजय लोखंडे, आनंदा यादव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
आंदोलनाच्या ठिकाणी लावलेल्या फलकावर असत्य : राफेल विमान बनविण्याची एचएल कंपनीची क्षमता नाही. हिंसा : सनातन संस्थेवर बंदी कधी आणणार? अशांती : कर्जमाफी घोषित केल्यानंतर शेतक-यांच्या आत्महत्या थांबल्या का ? या आत्महत्यांबद्दल कोणावर 302 कलम लावायचा? यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी असे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले.