- प्रतिभा महाविद्यालयात छ. शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ फेब्रुवारी २०२६) :- चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली. संस्थेचे संस्थापक सचिव दीपक शहा यांचे प्रोत्साहन आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांच्या मार्गदर्शनाखाली मोठया संख्येने विद्यार्थ्यांनी मोहननगर परिसरातून शिवज्योत ढोल-लेझीम, ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषा परीधान करून भव्य मिरवणूक काढली. मिरवणूक महाविद्यालयाच्या प्रांगणात आल्यानंतर तिचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी “छत्रपती शिवाजी महाराज की जय” च्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला.

शिवरायांच्या भव्य मूर्तीचे पूजन व आरती सोलापूर येथील व्याख्यात्या अँड. वृषाली इंगळे-पाटील यांच्या समवेत प्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, संयोजक डॉ. रोहित आकोलकर, डॉ. अमोल शिंदे, प्रा. सुकलाल कुंभार, प्रा. सुप्रिया गायकवाड, प्रा. ज्योती इंगळे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी वृषाली लाटे, प्रथमेश गलवाड आदींच्या उपस्थितीत करण्यात आली.
“छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा तरुण” या विषयावर व्याख्यात्या अँड. वृषाली इंगळे-पाटील यांचे व्याख्यान झाले. विद्यार्थ्यांनी ‘स्वराज्याची पहाट’ हे लघुनाट्य, ‘शिवजन्म पाळणा’ नृत्य आणि पोवाड्याचे सादरीकरण विद्यार्थी गौरव कालेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. श्री गणेश व्यायाम मंडळ, ब्रह्मसिंह गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळांत तलवारबाजी, दांडपट्टाचे सादरीकरण केले.
व्याख्यात्या अँड. वृषाली इंगळे-पाटील यांनी आपल्या व्याख्यानाच्या प्रारंभी विद्यार्थी व उपस्थितांना “मी माझ्या आयुष्यात कधीही व्यसन करणार नाही आणि प्रत्येक स्त्रीचा आदर करेन.”ही समुदायिक शपथ दिली . पुढे त्या शिवचरित्रावर भाष्य करताना मुलींना धैर्यशील बनण्याचे आवाहन केले. तसेच आई-वडील, भाऊ यांचा आदर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तरुणांना उद्देशून त्या म्हणाल्या की, आई-वडिलांचे नाव खाली जाईल असे कोणतेही कृत्य करू नका . आजच्या युवकांसमोर बेरोजगारी, प्रदूषण यांसारख्या अनेक गंभीर त्या सोडविण्यासाठी राजकारणात नेतृत्व करावयाचे असेल तर विचार करून पुढे आले पाहीजे . महाराष्ट्रात आज माणूसच माणसाचा शत्रू होत चालला आहे, त्यामुळे माणुसकी जोपासणे आवश्यक आहे. चुकीचा इतिहास सांगितला जात असेल तर त्याविरोधात आवाज उठवायला हवा. शिवचरित्रातील स्वाभीमान , धैर्य , स्त्रीला मातेसमान वागविणे हे गुण आत्मसात करा. हिंदू संस्कृती जपण्याचेही त्यांनी आवाहन केले.
मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी प्रस्ताविकात सांगितले की, या संस्थेतील विद्यार्थी अभ्यासाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा, बहीःशाल , एन.एस.एस. आदी कार्यक्रम माध्यमातून स्वतःला घडवत आहेत. अशा उपक्रमांतूनच उद्याचे नेतृत्व घडते. छत्रपती शिवाजी महाराजांचे असे कर्तृत्व व नेतृत्व होते कि पुढील हजारो वर्षे त्यांची जयंती साजरी होत राहील.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी सानिका गाढवे व निहाल बागल यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रथमेश गलवाडे, वृषाली लाटे, विराज काशीद, ओम जगताप, प्रतीक गावडे, जानवी धायगुडे, करिष्मा ठाकरे, अनिकेत जगदाळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.












