- चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयाचे राष्ट्रीय स्तरावर सायबर क्षेत्रात दैदिप्यमान यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०७ एप्रिल २०२६) :-चिंचवड येथील ‘प्रतिभा वाणिज्य आणि संगणक अध्ययन महाविद्यालयाने’ सायबर सुरक्षा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. क्विक हील फाउंडेशनच्या “सायबर शिक्षणासाठी सायबर सुरक्षा” या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत महाविद्यालयाच्या सायबर क्लबने उत्कृष्ट प्रदर्शन करत “सर्वोत्कृष्ट सर्वंकष (ओव्हरऑल) सायबर क्लब” या गटात द्वितीय उपविजेतेपद पटकावले.
देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत विविध राज्यांतील अनेक महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. प्रतिभा महाविद्यालयाच्या सायबर क्लबने सातत्यपूर्ण प्रयत्न, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि समाजात सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या कार्यामुळे या स्पर्धेत विशेष स्थान मिळवले.
या पुरस्कारांचे वितरण क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर आणि महाराष्ट्र सायबरचे उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक करत सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात तरुणांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित केले.
या कार्यक्रमास प्रतिभा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्या क्षितिजा गांधी, शिक्षक समन्वयिका डॉ. हर्षिता वाच्छानी तसेच सायबर क्लबचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्तरावरही उल्लेखनीय यश संपादन केले. आकाश ठाकूर यांनी “सर्वोत्कृष्ट सचिव” या विभागात प्रथम उपविजेतेपद मिळवले. स्नेहा तेली आणि साकीब चौधरी यांना “सर्वोत्कृष्ट सायबर योद्धा संघ” हा पुरस्कार प्राप्त झाला. श्रावणी सावंत यांना “सर्वोत्कृष्ट कामगिरी (सर्वोत्कृष्ट अध्यक्षा)” हा सन्मान मिळाला, तर मानसी वाडेकर यांना “सर्वोत्कृष्ट माध्यम संचालक” या विभागात नामांकन मिळाले. तसेच हर्षिता वच्छानी यांना “सर्वोत्कृष्ट शिक्षक समन्वयक” या विभागात नामांकन मिळाले.
प्रतिभा महाविद्यालयाच्या सायबर क्लबने केवळ स्पर्धांपुरतेच मर्यादित न राहता समाजात सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती, डिजिटल सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांमध्ये सायबर साक्षरता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. याच सातत्यपूर्ण कार्यामुळे महाविद्यालयाला राष्ट्रीय स्तरावर ही उल्लेखनीय कामगिरी करता आली आहे.
या दैदिप्यमान यशाबद्दल आयोजित कौतुक सोहळ्यात संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा म्हणाले, “सायबर सुरक्षित भारत घडविण्यासाठी युवा पिढीने पुढाकार घेणे आवश्यक आहे.” या यशामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक दुणावला असून, भविष्यात सायबर सुरक्षा क्षेत्रात आणखी मोठे योगदान देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
महाविद्यालयाच्या या यशस्वी वाटचालीमुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत असून, ‘सायबर सुरक्षित भारत’ घडविण्यासाठी युवा पिढी सज्ज असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
यावेळी संस्थेच्या खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










