न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०१९) :- राजर्षी शाहू महाराज म्हणजे समाजसुर्य असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. प्रदीप कदम यांनी केले. शरद नगर येथील राजर्षी शाहू महाराज विद्यालयात शाहू जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
शरदनगर येथील बोधिसत्व प्रतिष्ठान संचलित राजर्षी शाहू महाराज विद्यालयात राजर्षी शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाहू महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी बोधिसत्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोकुळ गायकवाड, सचिव लहू कांबळे, उपाध्यक्ष अंकुश कांबळे, मुख्याध्यापक बाबाजी शिंदे आदी उपस्थित होते.
प्रा.कदम पुढे म्हणाले कि, सामाजिक न्यायासाठी व विषमता नष्ट करण्यासाठी आयुष्य पणाला लावणारे छत्रपती म्हणून त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. युवकांनी अभ्यास, कष्ट, सातत्य व महापुरुषांचे विचार आत्मसात केले तर यश नक्कीच आहे. शाहू महराजांनी सर्व जाती धर्मातील मुलांसाठी वस्तीगृहे, शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा व मुलींसाठीही शाळा काढल्या. गरिब व बहुजनांच्या मुलांना स्वतः सहकार्य केले. शाहू मिल व राधानगरी धरण बांधून कामगार व शेतकऱ्यांचा विकास साधण्याचा आधुनिक पद्धतीने कृतीशील प्रयोग केला. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व अस्पृश्य समाजातील व दीन दलित विद्यार्थ्यांना ५०% आरक्षण दिले. देशातील सामाजिक क्रांतीचे जनक म्हणून त्यांची ओळख कायमच आहे. ज्ञान संपादन करुन त्याचा उपयोग समाज आणि राष्ट्रासाठी करण्याबाबत मार्गदर्शन प्रा कदम यांनी केले.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंकज कांबळे,स्वाती पाटील, देवेंद्र पाटील,दिनकर रनवरे,सुजाता जोगदंड,कोमल गायकवाड,सुवर्णा आरोटे,दैवशाला चोले,पूनम सुरवसे,क्रिडा शिक्षक संतोष घरडे,जितेंद्र सूर्यवंशी,प्रमोद रायकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन रूपाली पवार यांनी तर, आभार विकास म्हस्के यांनी मानले.















