न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई :- हवामानातील बदलामुळे राज्यात स्वाइन फ्लूचा प्रभाव वाढला असून जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत सुमारे १९९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज सांगितले. यामुळे नागरिकांनी सर्दी, ताप, घसादुखीचा आजार अंगावर काढू नये. औषधोपचारानंतर २४ तासांत बरे वाटले नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमिफ्लूच्या गोळ्या सुरू कराव्यात, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.
राज्यात ठिकठिकाणी स्वाइन फ्लू संशयित १६ हजार रुग्ण दाखल असून त्यांच्यावर खासगी तसेच महापालिका रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. राज्य शासनाने साथरोग नियंत्रणासाठी नेमलेल्या समितीची गेल्या आठवडय़ात बैठक झाली. यावेळी व्हेंटिलेटरवर असलेल्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर करावयाच्या उपचारांमध्ये एकसूत्रीपणा यावा यासाठी औषधोपचारांचा प्रोटोकॉल करण्याबाबत चर्चा झाली.
पुढील दोन दिवसांत हा प्रोटोकॉल राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांना तसेच महापालिकेच्या रुग्णालयांना पाठविण्यात येईल. त्यानुसार त्यांनी स्वाइन फ्लूबाधित रुग्णांवर उपचार करणे आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
हवामानातील बदल स्वाइन फ्लूच्या विषाणूसाठी पोषक असल्याचे दिसून येत असून, त्यामुळे हवेच्या माध्यमातून आणि संसर्गातून विषाणूंचा फैलाव होतो. अशा वेळी शिंकताना आणि खोकताना नाकातोंडावर रुमाल धरावा, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.