न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- नवरात्र उत्सवानिमित्त सध्या सर्वच ठिकाणी दांडियाने जोर धरला असून, पिंपरी चिंचवड शहरातील अनेक ठिकाणी दांडिया व गरबाचे आयोजन केले जात आहे व त्यात सहभाग नोंदवण्याकरीता नागरिकांची झुंबड उडत असल्याचे सर्वच ठिकाणी पहावयास मिळत आहे.
परंतु, चक्क एका महिलेस गरबा खेळू न दिल्याचा प्रकार नुकताच पिंपरीतील भटनागर येथे घडला असून ऐश्वर्या भाट-तामचीकर असे या महिलेचे नाव असून महिला दांडिया खेळावयास आली असता येथील मंडळाने तिचे दांडिया खेळणेच बंद केले.
खराडी परिसरात राहणारी ऐश्वर्या भाट-तामचीकर ही महीला माहेरी आली असता, भाटनगरमधील देवीच्या दर्शनासाठी गेली. त्यावेळी तिथे महिला दांडिया खेळत होत्या. त्यावेळी ती इतर महिलांसोबत दांडिया खेळू लागली, मात्र मंडळाने हे पाहताच दांडियाची गाणी बंद करून डीजे सुरु केला व दांडिया बंद केला.
यादरम्यान ऐश्वर्या काही वेळ तिथेच थांबली, थोड्या वेळानेही दांडिया सुरु न झाल्याने तिने एका मैत्रिणीला बोलावले. मैत्रिणीला तिथेच थांबवून ती तिथून निघून गेली. ती गेलेली पाहताच, मंडळाने पुन्हा दांडिया सुरू केला. हा सर्व प्रकार मैत्रिणीने तिला कळवला.
मे महिन्यात ऐश्वर्याने स्वतःच्याच विवाहात कौमार्य चाचणीला विरोध दर्शवला. जून महिन्यात एका विवाहातच जात पंचायतीसमोर अशी चाचणी घेऊ नये यावर जोर धरला. तेव्हा बराच गोंधळ झाला होता, त्यामुळे कौमार्य चाचणीला विरोध केल्यानेच मला गरबा खेळू दिला नाही असा आरोप ऐश्वर्याने केला असून या मंडळाच्या आठ जणांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
काय आहे कौमार्य चाचणी?
कंजारभाट समाजाताली स्त्री ‘व्यभिचारी’ आहे की नाही, हे ठरवणारी कौमार्य चाचणी लग्नानंतर घेतली जाते. अरेंज मॅरेज करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही कौमार्य चाचणी द्यावी लागते. कित्येक वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे.
हिंदू वैदिक पद्धतीने लग्न झाल्यानंतर त्याच लग्नमंडपात लगेचच पंचायत भरवली जाते. तिथे नवविवाहित जोडप्याला कौमार्य चाचणीसाठी मानसिकदृष्ट्या तयार केलं जातं.
त्यानंतर कंजारभाट समाजाच्या ‘प्रतिसंविधानातील’ कलम ३८ (१,२,३,४ ) चा आधार घेत त्या दोघांना लॉजवर घेऊन जातात. त्यांच्यासोबत दोन्हीकडचे नातेवाईक उपस्थित असतात. इजा करणारी कोणतीही टोकदार वस्तू नाही याची शहानिशा करण्यासाठी त्या रूमची अतिशय बारकाईने तपासणी केली जाते.