न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी चिंचवडची तहान भागवणारे पवना धरण पूर्ण क्षमतेने भरले असूनही पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी तयार केला असून सत्ताधारी पदाधिकारी व विरोधी गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाणार आहे.
महापालिका धरणातून दररोज ४८० ते ५०० एमएलडी पाण्याचा उपसा करते. तरीही, शहरातील सर्वच भागात अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. गणपती उत्सवात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला. नवरात्रात देखील शहराच्या अनेक भागातील पाणी पुरवठा विस्कळीत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना पालिका प्रशासनाने आता पाणी कपातीचे धोरण तयार केले आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
यावेळी नगरसेवक राजू मिसाळ म्हणाले, ‘प्राधिकरणात विस्कळीत पाणीपुरवठा सुरु आहे. सध्यस्थितीत पाणी मुबलक असल्याने पाणी कपातीला आमचा विरोध आहे. पाण्यावरुन आम्ही कोणतेही राजकारण करणार नाही. त्यामुळे सर्व भागात समान पाणीपुरवठा करावा.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘शहराच्या काही भागात जादा, तर काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. समान पाणीपुरवठा करण्यासाठी आठ दिवसातून शहरातील एका भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात यावा किंवा एक दिवसाआड पाणीपुरवठा केल्यास समान पाणीपुरवठा होण्यास मदत होईल. याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. गटनेत्यांची बैठक घेऊन त्यावर निर्णय घेतला जाईल’.
महापाैर राहूल जाधव यावेळी म्हणाले कि, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटसरीने वापर करायला हवा. जलसंपदा विभागाने त्याबाबत पालिकेला पत्र दिले आहे. शहरात उच्च दाबाने व सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी कपात करणे आवश्यक आहे. त्यासाठी आयुक्तांनी प्रस्ताव तयार केला असून गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेवून त्यांनी दोन दिवसात अमंलबजावणी करण्यात येईल.