न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- मोटारीतून आलेल्या चौघांनी वर्दळीच्या रस्त्यावरून तरुणीचे अपहरण केले. रस्त्यात तिचा विनयभंगही केला. मात्र, आरडाओरडा केल्याने तिला रस्त्यात सोडून दिले. हा धक्कादायक प्रकार हिंजवडी येथे गुरुवारी (दि. २५) रात्री नऊच्या सुमारास घडला.
याप्रकरणी २२ वर्षीय पीडित तरुणीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चार अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत गवारी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही मूळची गोव्याची असून, ती हिंजवडी येथे इव्हेन्ट मॅनजमेंटचे काम करते.
गुरुवारी रात्री ती फोनवर बोलत हिंजवडीतील शिवाजी चौकात थांबली होती. यावेळी तिच्याजवळ एक मोटार आली. मोटारीतील चार जणांनी तिला जबरदस्तीने आत खेचून बसवले. त्यातील चौघांनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने प्रतिकार करीत आरडाओरडा केला. त्यानंतर आरोपींनी तिला डांगे चौकात रात्री दहाच्या सुमारास सोडून दिले. याप्रकरणी पिडीतेने फिर्याद दिली असून, हिंजवडी पोलिस परिसरातील सीसी टीव्ही व तिने सांगितलेल्या वर्णनावरून आरोपीचा शोध घेत आहेत.