- महाराष्ट्राचा आजवरचा सर्वात यशस्वी अर्थसंकल्प; अजितदादा अभिनंदनास पात्र – संदीप काटे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मार्च २०२०) :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सभागृहात सादर केला. राज्यावरील वाढलेला कर्जाचा बोजा, घटलेली परकीय गुंतवणूक, दरडोई उत्पन्नात झालेली घसरण या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पाद्वारे प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. विशेषकरून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांच्या विचारधारेला न्याय देत, अर्थसंकल्पात सर्वसमावेशक योजनांचा समावेश करण्यात अर्थमंत्री अजितदादांना यश आले आहे. त्यामुळे राज्याच्या विकासात राष्ट्रवादीचे योगदान कसे महत्वाचे आहे, हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या व्यवहार चातुर्य व कर्तबगारीने विरोधकांसह राज्यातील जनतेला पुन्हा एकदा दाखवून दिले. निश्चितच अजितदादांना विरोध करणाऱ्यांचे तकलादू विरोध मोडीत निघाले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातही अजितदादा अल्पावधीतच लक्ष घालतील व शहराच्या बिघडलेल्या कारभाराचा गाडा नक्कीच रुळावर आणतील, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
या पत्रकात काटे यांनी म्हटले आहे की, अजितदादांपुढे महसूली तुटीच्या पार्श्वभूमीवर सर्व घटकांच्या अपेक्षा पूर्ण करुन विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प सादर करणे हे एक आव्हान होते. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा सामान्य माणसाला अपेक्षित असा हा अर्थसंकल्प आहे व मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी राज्याला दिशा देणारा आहे. केंद्राच्या निधीची वाट न बघता राज्यातील शेतकऱ्यांसाठी घवघवीत योजनांसोबत, भूमिपुत्रांना नोकऱ्यांत आरक्षण, मुद्रांक शुल्कात १ टक्क्यांची कपात ही या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील, असेही काटे म्हणाले.
मंदावलेल्या गृहबांधणी क्षेत्रातील पुणे, मुंबई आणि नागपूरमध्ये बांधकाम उदयोगाला चालना देण्यासाठी पुढच्या वर्षासाठी मुद्रांक शुल्कामध्ये १ टक्के सवलत देण्यात आली आहे. औदयोगिक वापराच्या वीजेच्या शुल्कातही सवलत देण्यात आली आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विकासासाठीही अजितदादांनी अनेक घोषणा केल्या आहेत. पुणे शहरात वाहतूक कोडीं सोडविण्यासाठी पुणे शहराच्या बाहेरून रिंग रोड करण्यात येणार आहे. चार वर्षात हा रिंग रोड तयार होणार आहे. पुणे पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे काम सुरू आहे. मागच्या सरकारच्या काळात देण्यात आलेल्या निधीपेक्षा जास्त निधी आगामी वर्षात देण्याची घोषणा अजितदादांनी केली आहे. स्वारगेट ते कात्रजर्यंत मेट्रोचा विस्तार करण्यात येणार आहे. पुणे शहरात आणखी एका विमानतळाची भर पडणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल असलेल्या बालेवाडीत आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील महिला सुरक्षेला प्राधान्य दिले असून, पायाभूत सुविधांना भरीव मदत केली आहे. कुठलेही सरकार स्थापन झाल्यानंतर त्या सरकारने मांडलेला पहिला अर्थसंकल्प हा राज्याच्या पुढील पाच वर्षाची वाटचाल अधोरेखित करत असतो. त्यादृष्टीने महाविकास आघाडी सरकारच्यावतीने अर्थमंत्री अजितदादांनी मांडलेला अर्थसंकल्प आर्थिक संकटात सापडलेल्या राज्याला पुन्हा एकदा उभारी देईल, असेही काटे म्हणाले.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने अजितदादांनी पिंपरी-चिंचवड शहरातील दिवसाआड पाण्याचा प्रश्न, मिळकतकर वाढ, शास्तीकर, महापालिकेचा येस बँकेतील अडकलेला निधी, सत्ताधाऱ्यांची सभागृहात चालणारी मग्रुरी यासारखे आणखी काही प्रश्न निकली काढण्यासाठी लवकरच शहरात बैठक घ्यावी व आपल्या कर्तबगारीने हे सर्व प्रश्न निकाली काढावेत, अशी अपेक्षा आहे. तूर्तास तरी अजितदादांनी खंबीरपणे विरोधकांना चारी मुंड्या चीत करीत महाराष्ट्राचा यशस्वीपणे अर्थसंकल्प सादर केला. त्यामुळे ते अभिनंदनास पात्र आहेत, असे या पत्रकात संदीप काटे यांनी म्हटले आहे.