- ‘एकमेकांपासून दूर राहणं आणि घरातच राहणं’ हाच एकमात्र उपाय – पंतप्रधान मोदी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मार्च २०२०) :- ‘जनता कर्फ्यूनं दाखवून दिलं की, देशावर ज्यावेळी कोणतही संकट येत तेव्हा संपूर्ण देश एकजुट होतो. करोनासारख्या महारोगानं जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवलं आहे. त्या राष्ट्रांकडं साधन नाहीत, असं नाही. पण, हा आजार इतक्या वेगानं पसरत आहे की, तयारीच करता येत नाही. त्यामुळे आज रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे,’ अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी आज केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,’ करोनामुळे देशासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. या महारोगाचा संसर्ग इतक्या झपाट्यानं होत आहे की, त्यांची साखळी तोडण्याशिवाय देशासमोर कोणताही पर्याय नाही. आगीसारखा हा आजार पसरत चालला आहे. त्यामुळे एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे, तो म्हणजे एकमेकांपासून दूर राहणं आणि घरातच राहणं. देशाच्या भल्यासाठी देशातील जनतेच्या भविष्यासाठी आज मी इथे मोठी घोषणा करत आहे. ध्यान देऊन ऐका. आज रात्री बारा वाजेपासून २१ दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे. हा लॉकडाउन जनता कर्फ्यूसारखा नसेल. अत्यंत कडक पद्धतीनं लागू केला जाईल,’ असं मोदी यांनी सांगितलं.
देशातील जनतेला संबोधित करताना मोदी म्हणाले, ‘करोनाचं संकट परतवून लावण्यासाठी एकच पर्याय आहे. घरात राहणं. तुमची एक चूक तुमच्या घरापर्यंत करोनाला घेऊन येऊ शकतो. ज्यावेळी करोनाचा उद्रेक झाला. त्यानंतर सुरूवातीच्या काळात प्रसाराचा वेग खूप कमी होता. पण, त्यानंतर हे प्रचंड वाढलं. मी देशवासियांना आवाहन करतो. त्यांनी घरातच राहून या संकटाला परतवून लावण्यासाठी मदत करावी. ही वेळ धैर्यानं सामोर जाण्याची आहे. भारत अशा टप्प्यावर आहे. ज्यामुळे भारता अनेक आर्थिक संकटांचा मुकाबला करावा लागणार आहे. पण, एक लक्षात ठेवा जान है तो जहाॅन है,’ असं म्हणत मोदी यांनी देशवासियांना धीर दिला.













