न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी :- रहाटणी येथील राहुल मित्र मंडळ व संघ मित्र महिला मंडळाच्यावतीने सारनाथ बुद्धविहार येथे आश्विन पौर्णिमेनिमित्त वर्षावास समाप्ती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुत्तपठण करण्यात आले. राष्ट्रीय प्रवचनकार डॉ. दि. बा. बागुल व एन. सी. पी. स्कूलचे अध्यक्ष अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते डॉ. बाबसाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय प्रवचनकार डॉ. दि. बा. बागुल, आर. डी. भालेराव, एन. सी. पी. चे अध्यक्ष अरुण चाबुकस्वार, अध्यक्ष शांताराम भालेराव, संघमित्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा कल्पना हालू, गोरख रोकडे, अमित भालेराव, बी. एस. कांबळे आदी उपस्थित होते.
डॉ. दि. बा. बागुल यावेळी म्हणाले की, डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी बुद्धांनी दिलेले ज्ञान स्वतः अंगीकारून व बुद्ध विचार प्रत्यक्षात आमलात आणून धम्मक्रांती तर केलीच परंतु, देशातील पिचलेल्या समाजाला अंगभर कपडा दिला, पोटभर भाकर दिली, बहिष्कृत समाजाला एकत्र आणले. समाजपरिवर्तन दिशा रक्तरंजित न करता बुद्धांच्या शीलांचे आचरण करून समाजाला परिवर्तनशील बनवले, त्यामुळे डॉ. आंबेडकर हे महाबुद्ध आहेत.
एन. सी. पी. स्कूलचे अध्यक्ष अरुण चाबुकस्वार म्हणाले की, समाज प्रगतीशील बनवण्यासाठी डॉ. आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या कार्याचा अभ्यास करून त्रिसूत्री मार्गाचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून सामाजिक शांतता, आर्थिक स्थैर्य व विकसित व्यक्तिमत्व तयार होऊन समाजाला हातभार लागेल.
गेल्या तीन महिन्यांपासून दररोज सायंकाळी बुद्ध व त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे पठण घेण्यात येत होते. या कार्यक्रमाची वर्षवास म्हणजेच समाप्ती करण्यात आली. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर समाजबांधव उपस्थित होते. यावेळी मा. पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव यांनी सूत्रसंचालन तर गोरख रोकडे यांनी आभार मानले.