न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याचा विषय महापालिकेच्या २० ऑक्टोबरच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला होता. आयुक्तांनी साडेसहा तास चाललेल्या एकाच विषयावरील चर्चेनंतर प्रशासनाचा खुलासा न घेताच ही सभा तहकूब केली होती. आज बुधवार (दि.३१) रोजी ही तहकूब सभा पार पडली. महापौर राहूल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शहरात पाणी गळती, अनधिकृत नळजोड आणि चोरीच्या माध्यमातून सुमारे ४० टक्के पाणी हिशोबबाह्य आहे. सव्वालाखांहून अधिक अऩधिकृत नळजोड आहेत. हे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. त्याकरीता प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. अनधिकृत नळजोड अधिकृत करणार असून नागरिकांवर फौजदारी कारवाईचा त्यांनी पुनरुच्चार केला. तर,पाण्याची उपलब्धता हा महत्त्वाचा भाग असल्याचे सांगताना पवना जलवाहिनी व आंद्रा, भामा आसखेडचे पाणी तातडीने आणणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
पाणी आरक्षण मिळाले असून पुढील कार्यवाही चालू आहे. पाणीपुरवठा सुरळित करण्यासाठी पुढील काळात शहराच १९ पाण्याच्या टाक्या व काही जल वाहिन्या टाकण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ३ वर्षात पाणीपुरवठ्यावर आणखी २०० कोटी खर्च करावे लागणार असल्याचे सांगितले आयुक्तांनी सांगितले.
यावेळी नगरसेवकांनी तांत्रिक गोष्टीत आम्हाला काही घेणे देणे नाही, नागरिकांना पाणी द्या म्हणून, प्रशासनास धारेवर धरले. तसेच आयुक्तांचा हा खुलासा आम्ही प्रभागातील नागरिकांना देऊ शकत नाही. पाणी समस्या दीड महिन्यांपासून नव्हे, तर दीड वर्षांपासून भेडसावत आहे. लोक पाणी प्रश्नावर कोणतेही कारण दिले तरी, ऐकत नाहीत, तर काही नगरसेवकांनी आयुक्तांनी केलेल्या खुलाशातील एकही शब्द समजला नसल्याचे सांगितले.
काही नगरसेवकांनी आम्ही पाण्याच्या मुद्दयावर निवडून आलो आहोत. परंतु, दीड वर्षात पाण्याचा प्रश्न सोडवू शकलो नाहीत. त्यासाठी वारंवार पाठपुरावा करुन देखील प्रश्न मार्गी लागत नाही याची खंत वाटत आहे. पाण्यासाठी नागरिकांचा फोन आला की भिती वाटते त्यामुळे आयुक्तांनी पाण्याच्या प्रश्नांची दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करव्यात, अन्यथा ज्या कोणासाठी पाण्याची चोरी होत आहे, त्यांची बुरखे फाडू असा सज्जड इशाराही यावेळी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत दिला आहे.