न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- सामाजिक कार्यकर्ते व मा. नगरसेवक मारुती भापकर यांनी आयक्त श्रावण हर्डीकर यांच्या दुतोंडी कारभाराची निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असून, आयुक्त मनमर्जी कारभार करीत असल्याचा ठपका ठेवला आहे.
भापकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या पवना धरणामध्ये २२ टक्के पाणीसाठा शिल्लक असताना हे पाणी ५० ते ५५ दिवस म्हणजे जुलै अखेरपर्यंत पाण्याचा पुरवठा होऊ शकत होता, असे असताना जुलैमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याचे कारण देत पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, ताथवडे, रावेत, वाकड, पुनावळे, मामुर्डी, किवळे या चिंचवड विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या भागातील मोठ्या गृहप्रकल्पांना बांधकाम परवाना देऊ नये असा प्रस्ताव स्थायी समितीत दि. १३ जून २०१८ रोजी मंजूर करण्यात आला होता. मात्र त्या अगोदरच प्रशासनाने दि. ६ जून २०१८ पासुनच अशा मोठ्या गृहप्रकल्पांना एनओसी न देण्याचा निर्णय घेतला होता.
एनओसी बंद करण्याचे आणि एनओसी सुरु करण्याचे आदेश मी दिलेलेच नव्हते, माझा त्याच्याशी काडीचाही संबंध नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. आयुक्त हर्डीकर एनओसी बंद करणे व सुरु करणे याची मला कल्पना नव्हती, असे म्हणू शकत नाहीत. त्यांना आपण १४ जून रोजी लेखी पत्र दिले होते. असा निर्णय आयुक्तांना लेखी आदेशाद्वारे करणे कायदेशीर अडचणीचे होते, म्हणूनच आयुक्तांनी तोंडी आदेश देऊन, रामदास तांबे यांना हे काम करण्यास भाग पाडले.
यामध्ये आर्थिक लाभ झाल्यानंतर आयुक्तांनी पुन्हा बांधकाम व्यावसायिकांना एनओसी देण्याची सेवा सुरु करण्याचे आदेश दिले. ४ व ५ ऑक्टोबर या तारखेला काही विशिष्ट बांधकाम व्यावसायिकांना एनओसी देण्यात आल्या. त्यामुळे आयुक्त हर्डीकर यांनी प्रशासकीय व्यवस्थेला राज्यकर्त्यांच्या दावणीला बांधले असल्याचे स्पष्ट होत असून, मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी सखोल चौकशीचे आदेश द्यावेत, असे भापकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.