न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली :- चिखली परिसरातील कुदळवाडी-चिखली येथील पंचशील फिल्टर कंपनीस गुरुवार (दि.३१) रोजी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास आग लागली होती. आगीत सर्व साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाचे ८ बंब आणि १२ वॉटर टॅंकरने साडे चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
चिखली आणि संत तुकाराम नगर, पिंपरी येथील अग्निशामक मुख्यालयातून प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र आगीचे उग्र स्वरूप लक्षात घेता प्राधिकरण, भोसरी, तळवडे आणि अग्निशमन मुख्यालयातून आणखी आगीचे बंब घटनास्थळी बोलावले. तरीही आग आटोक्यात येत नसल्याने एमआयडीसी हिंजवडी आणि चाकण, पुणे अग्निशामक दल आणि खासगी कंपनींचेही बंब बोलावले.
मात्र, वीज पुरवठा सुरुच असल्याने आगीमुळे महा-वितरणच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये स्पार्कींग होऊन फुटल्याचा आवाज होत होता. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचण येत होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी महा-वितरणच्या अधिकाऱ्यांना सांगून वीज पुरवठा खंडीत केला. त्यामुळे पवार वस्ती व परिसरातील बोअरवेल व विहिरींमधून पाण्याचा उपसा टॅंकरला करता येईना. त्यामुळे पवार वस्तीचा वीज पुरवठा पुन्हा सुरू केला. येथून भरून येणाऱ्या वॉटर टॅंकरची आग आटोक्यात आणण्यात मोठी मदत झाली.
अक्षय बाफना आणि सुरेश बाफना हे या कंपनीचे मालक आहेत. येथे फिल्टर्स तयार करण्यासाठी फॅब्रिक मटेरियल आणि कागदाचा उपयोग होतो. या साहित्यामुळे आग झपाट्याने पसरली. या घटनेच्या वेळी केवळ एक सुरक्षा रक्षक ड्यूटीवर होता. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागली होती. कंपनीत अग्नी प्रतिबंधक उपाय-योजना नसल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
काही दिवसांपूर्वीच या परिसरातील स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांनी वाढत्या आगीच्या दुर्घटनेवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पिंपरी चिंचवड मनपाचे महापौर, आयुक्त, व अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती व मागणीचे निवेदनही दिले होते, परंतु प्रशासन व सत्ताधारी यांनी जाणूनबुजून या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. आज पुन्हा एकदा आग दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली असून आता तरी महापालिका व प्रशासनाने या प्रश्नाची दखल घ्यावी, असे दिनेश यादव यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना सांगितले.